एकनाथ शिंदेंकडून पैसेवाटप, कोल्हापुरातल्या हॉटेलात ठेवले १०० कोटी ठाकरे गटाचा मोठा आरोप

मुंबई, ८ मे २०२४ ः बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटातील नेत्यांनी मतांसाठी पैसे वाटल्याचा, सातारा लोकसभेत भाजपाने पैसे वाटल्याचा आरोप होत असतानाच आता शिवसेनेच्या शिंदे गटावरही असाच आरोप होत आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी आरोप केला आहे की, स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरात पैसे वाटले आहेत. संजय राऊत म्हणाले मुख्यमंत्री, सलग दोन दिवस कोल्हापुरात पैसे वाटत फिरत होते. कोल्हापूरमधील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती (दुसरे) यांचा पराभव करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी १०० कोटी रुपये वाटले आहेत.

संजय राऊत म्हणाले, नकली शिवसेनावाले पैसे वाटत फिरत आहेत. चोरलेला धनुष्यबाण विजयी करण्यासाठी मतदारांना पैसे वाटत आहेत. कोल्हापूरला आमच्या शाहू महाराजांचा पराभव करण्यासाठी रडीचा डाव खेळतायत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना हरवण्यासाठी नकली शिवसेनावाले महाशय कोल्हापूरमधील एका हॉटेलमध्ये तब्बल १०० कोटी रुपये घेऊन बसले होते. ज्या शाहू आणि शिवाजी महाराजांपुढे आपण नतमस्तक होतो. ज्यांच्या नावाने आपली शिवेसना चालली आहे, त्यांच्या वंशजांचा पराभव करण्यासाठी हे लोक मतदारांना पैशाचं अमिष दाखवत आहेत. मुळात पैशांशिवाय त्यांच्याकडे आहे तरी काय?
ठाकरे गटातील खासदार म्हणाले, तोतया मुख्यमंत्र्यांकडे चोरीच्या मालाशिवाय काहीच नाही. सगळा चोरीचा माल घेऊन बसलेत. चोरीचा पक्ष, लुटीचा धनुष्यबाण घेऊन बसलेत. ठाणे महानगरपालिकेत लोकांना पगार द्यायला पैसे नसतील, मात्र यांच्याकडे मतदारांना वाटण्यासाठी पैसे आहेत. एकेका आमदाराला ५०-५० कोटी रुपये देऊन खरेदी केलंय. एकेका खासदाराला १००-१०० कोटी रुपये दिले आहेत. मी आमचा ठाण्याचा लोकसभेचा उमेदवार राजन विचारेला एकच सांगेन. या लोकांनी ५०-५०, १००-१०० कोटी रुपयांसाठी निष्ठा विकली आहे. मात्र तू निष्ठेच्या नावाखाली वणवण फिरतोयस. त्यामुळे लोक तुलाच मतदान करतील. ठाणे लोकसभेची निवडणूक खूप रंगतदार होणार आहे. राजन, तू या निवडणुकीत फार घाम गाळू नकोस, तू शिवसेनेच्या शाखेत नुसता बसून राहिलास तरी लोक तुझ्या पारड्यात भरघोस मतदान टाकतील.

राऊत म्हणाले, ४ जूननंतर (लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर) ठाण्यातील जनता एकनाथ शिंदेंना ठाण्यातून पळवून लावेल आणि मोदी नावाचं पार्सल हिमालयात जाणार. त्यामुळे मला वाटतं की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि नरेंद्र मोदींचा पासपोर्ट आत्ताच जप्त करायला हवा. कारण त्यांनी अनेक अपराध केले आहेत, आपला देश लुटला आहे. ब्रिटीशांपेक्षा अधिक लुटमार या लोकांनी केली आहे.