राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रेसमध्ये होणार विलिणीकरण? काँग्रेस सकारात्मक, शरद पवार सहकार्यांशी चर्चा करणार

मुंबई, ८ मे २०२४ ः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी गौप्यस्फोट केला. काँग्रेसमध्ये प्रादेशिक पक्ष विलीन होतील, राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल पक्षातील सहकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे वक्तव्य शरद पवार यांनी केल्यानंतर राजकीय क्षेत्रात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि भाजपकडून प्रतिक्रिया आली आहे. शरद पवार यांनी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर महायुतीचे समन्वयक आमदार प्रसाद लाड यांनी एक्सवर ट्वीट करत निशाणा साधला आहे. ज्यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे गटाला टोला लगावला आहे.

काय म्हणाले नाना पटोले
शरद पवार यांच्या मुलाखतीमधील वक्तव्यानंतर नाना पटोले म्हणाले की, नुकतेच पुण्याला राहुल गांधी आले होते. त्यावेळी राहुल गांधींनी मला सांगितले की, राज्यात सर्वत्र प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये समाविष्ट होतील ही चर्चा आहे. भाजपच्या तानाशाहीचा विरोधात अनेक पक्ष एकत्र येणार आहेत. अनेक पक्षांनी भाजपच्या विरोधात त्यांच्या तानाशाहीच्या विरोधात मोट बांधावी, असे राहुल गांधी यांना सांगितले. त्यामुळे शरद पवार यांच्या वक्तव्यात तथ्य आहे, असे नाना पाटोले यांनी सांगितले. गांधी परिवारच्या नेतृत्वाखाली सर्व पक्ष एकत्र काम करणार आहेत. त्यामुळे अटी शर्ती काही नाही. कश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत राहुल गांधींनी काढलेल्या पदयात्रा नागरिकांचा विश्वास वाढला आहे, असे पटोले यांनी म्हटले आहे.

विजय वडेट्टीवार म्हणतात…
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, शरद पवार साहेब मूळ गांधी विचारांचे आहेत. गांधी विचार कोणी संपवू शकत नाही. काही पक्ष हे अवकाळी पावसासारखे आहेत. अवकाळी पाऊस जनमाणसाला उद्धवस्थ करून जातो, तशी आताच्या सत्ताधाऱ्यांची परिस्थिती आहे. परंतु काँग्रेस हा निरंतर वाहणाऱ्या नदीसारखा पक्ष आहे. ज्या विचारांनी हा पक्ष उभा झालेला आहे. राजीव गांधी ते मनमोहन सिंग यांच्यापर्यंत विकास हा अजेंडा राहिलेला आहे. आता बदलाचे वारे वाहू लागले आहेत. जनता पूर्ण देश बदलण्याची तयारी करून बसलेली आहे. काँग्रेसच्या मागे जनता उभी असल्याचे दिसून येत आहे. पवार साहेबांच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे आणि पवार साहेबांसारखे मोठे नेते ज्यावेळी बोलतात त्यावेळी त्यांना फार दूरच अभ्यास असतो. त्यांना दूरदृष्टी आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
शरद पवारांचा जन्मच काँग्रेस आहे, गांधी विचारधार आहे. ते तालमीतच तयार झाले आहेतृ. यशवंतराव चव्हाण पासून त्यांच्या कारकीर्दी सुरुवात झाली. त्यामुळे त्यांना काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल, असे वाटणे स्वाभाविक आहे,असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.