आम्हाला डिवचल्यास गप्प बसणार नाही – जरांगे पाटील यांचा भुजबळांना कडक इशारा

नांदेड, २ ऑक्टोबर २०२३: आम्हांला डिवचल्यासं गप्प बसणार नसल्याचं म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना कडक शब्दांत इशाराच दिला आहे. मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सोडल्यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर असल्याचं पाहायला मिळतंय. अशातच ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन छगन भुजबळही आपली भूमिका मांडताना दिसून येत आहेत. त्यावरुनच मनोज जरांगे यांनी छगन भुजबळांच्या भूमिकेवर बोट ठेवत कडक इशारा दिला आहे.

उपोषण सुटल्यापासून कधीच कोणावर बोललो नाही. पण छगन भुजबळ साहेब बोलले होते. त्यावर मी माझं मत माडलं आहे. आम्ही काय गप्प बसणार का? आम्हाला डिवचल्यावर आम्ही गप्प बसणार नाही. तुम्ही गप्प बसणार का? तुम्हीसुद्धा गप्प बसणार नाही. त्यामुळे तुम्ही मराठ्यांना का डिवचता? तुम्ही डिवचलं म्हणून आम्ही टीका केली, असल्याचं ते म्हणाले आहेत.

राज्यातील ओबीसी नेते जे आता मराठा आरक्षणाला विरोध करतायत, त्यांना मराठा समाजाने आतापर्यंत खूप काही दिलं आहे. तुम्ही कधीतरी मराठ्यांच्या कामी याल म्हणून मराठ्यांनी छगन भुजबळांना मदत केली. आता आम्ही आरक्षण घ्यायची वेळ आली तर आम्हाला म्हणतात की ५० टक्क्यांच्या आत आरक्षण घेऊ देणार नाही. पण आम्ही ५० टक्क्यांच्या आतच आरक्षण घेऊ, असंही ते म्हणाले आहेत.

मराठा समाजाला आरक्षण देण्यास माझा विरोध नाही. मराठा समाजाला निश्चित आरक्षण द्या. ज्यावेळी फडणवीस यांनी यासंदर्भात विधेयक आणले तेव्हा मीही त्याला पाठिंबा दिला. एकढंच आहे की, ओबीसींचं आरक्षण फार कमी आहे. लोकसंख्या खूप जास्त आहे. पाऊणे चारशे जाती आहेत. १७ टक्के आरक्षण शिल्लक आहे, त्यामुळे त्यांना वेगळे आरक्षण द्या. त्यासाठी असलेली अडचण दूर करा.

दरम्यान, भुजबळांवरील टीकेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं असून मी स्वतःहून भुजबळांवर टीका केली नाही. ते बोलले म्हणून मी बोललो. ते बोलले मराठ्यांना आरक्षण देऊ नका, म्हणून मी बोललो. मी कोणावरच आधी टीका करत नाही. मराठ्यांना आरक्षणच द्यायचं नाही, इकडे घुसायचंच नाही, असं ते बोलले मग मी उत्तर दिलं. भुजबळ बोलण्याआधी मी काही बोललो का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.