बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही जातिनिहाय जनगणना करा – चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी

नागपूर, २ ऑक्टोबर २०२३: बिहारच्या धर्तीवर आता महाराष्ट्रादेखील जातिनिहाय जनगणना होणार असल्याची शक्यता आहे. कारण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुती सरकारकडे ओबीसी जनगणनेची मागणी करणार असल्याचे संकेतच दिले आहेत. भाजपच्या जागर यात्रेदरम्यान ते बोलत होते. त्यामुळे आता महाराष्ट्रातही बिहारप्रमाणेच जातिनिहाय जनगणना होणार असल्याचं बोललं जात आहे.

राज्यात मागील अनेक वर्षांपासून ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना व्हावी, अशी मागणी करण्यात येत आहे. यामध्येे भाजपचे नेते आणि माजी आमदार आशिष देशमुखांनीही यासंदर्भात उघडपणे भाष्य केलं आहे. बिहारने आजच ओबीसींच्या जनगणनेची आकडेवारी जारी केलीयं. त्यामुळे महाराष्ट्र सरकारनेही अशीच जनगणना करणं गरजेचं असल्याचं आशिष देशमुख म्हणाले आहेत. त्यानंतर बावनकुळेंनीही आपण राज्य सरकारकडे मागणी करावी अशी विनंती देशमुखांनी केली.

बावनकुळे म्हणाले, राज्यात भाजप, शिवसेना महायुतीचं सरकार आहे. आशिष देशमुखांनी मला ओबीसींची अर्थिक सामाजिक आकडेवारी गोळा करण्याची विनंती केलीयं, त्यानूसार भाजप सरकारला असा सर्वे करुन ओबीसी समाजाची आकडेवारी जाहीर करण्याची मागणी करणार असल्याचं बावनकुळेंनी सांगितलं आहे.

देशात काँग्रेस सरकार असताना काँग्रेस नेते राहुल गांधींनी सर्वात आधी जातिनिहाय जनगणनेची मागणी केली होती. त्यानंतर आता भाजपकडूनही जातिनिहाय जनगणनेला हिरवा कंदील मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे.

एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि दुसरीकडे ओबीसी जनगणनेच्या मागणीने जोर धरला आहे. या परिस्थितीत नितीशकुमार यांनी जातनिहाय जनगणनेची आकडेवारी जारी केल्यामुळे आता सरकारवर अशी गणना करण्याचा मोठा दबाव वाढणार असल्याची शक्यता आहे.

बिहार सरकारकडून आज जातिनिहाय जनगणनेचा अहवाल जाहीर करण्यात आला आहे. देशात जातिनिहाय जनगणनेवरुन अनेक घडामोडी घडल्या आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात १८८१ साली पहिल्यांदा जातिनिहाय जनगणना ब्रिटीश राजवटीत करण्यात आली होती.

त्यानंतरही अनेकदा झाली. काही नेत्यांकडून जातिनिहाय जनगणनेचं समर्थन केल्याचं पाहायला मिळालं तर काही नेत्यांनी आत्तापर्यंत विरोध केल्याचं दिसून आलं.