राष्ट्रवादीतील गोंधळानंतर वज्रमुठ सभा रद्द

पुणे, ३ मे २०२३: भाजप आणि शिंदे गटाच्या विरोधात वज्रमुठ सभेतून हल्लाबोल केला जात असताना आता महाविकास आघाडीतील बिघाडी समोर आली आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राष्ट्रीय अध्यक्षपदावरून घोळ सुरू असताना आता तीव्र उन्हाचे कारण देत पुणे, नाशिक आणि कोल्हापूर येथील वज्रमुठ सभा रद्द करण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.

संभाजीनगर, नागपूर आणि मुंबई या ठिकाणी वज्रमूठ सभा झाल्या, त्या सभांना मोठी गर्दी झाल्याने महाविकास आघाडीत आनंदाचे वातावरण होतेच. तसेच ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रतिसाद मिळत असल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण झाला. त्यांना मिळणारी सहानूभुती अद्याप कायम असल्याचे समोर आले. मात्र, आता या सभा गुंडाळण्यात आल्या आहेत.
जयंत पाटील म्हणाले, ‘‘एक मे रोजीच्या वज्रमूठ सभेमध्ये आमचे ठरले होते की नाशिक, पुणे, कोल्हापूर येथे होणाऱ्या वज्रमूठ सभा या काही दिवसांनंतर घ्यायच्या आहेत. सध्या ऊन खूप वाढत आहे. त्यामुळे या सभांच्या तारखा पुढे ढकलण्याचा निर्णय आधीच झाल्याचे ते म्हणाले आहेत. त्यामुळे आता आागामी काळात होणाऱ्या वज्रमूठ सभा या रद्द झाल्या आहेत.

काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर महाविकास आघाडी राहणार की तूटणार याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. आज सकाळीच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील पुढच्या होणाऱ्या वज्रमूठ सभांविषयी भाष्य केले होते.
याअगोदर जयंत पाटील यांना आजच्या वाय. बी. चव्हाण सेंटरमधील राष्ट्रवादीच्या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले नव्हते. त्यावर त्यांनी भाष्य केले आहे. मला बैठकीला बोलवण्याची गरज वाटली नसेल. प्रत्येक ठिकाणी आपण असलचं पाहिजे, असा आग्रह आपण करु नये, असे ते म्हणाले आहेत. तसेच बैठकीला बोलवले नसल्याने जयंत पाटील नाराज असल्याचे बोलले जात होते. त्यावर देखील त्यांनी भाष्य केले आहे. मी पक्षावर नाराज नाही व पक्षदेखील माझ्यावर नाराज नाही, असे ते म्हणाले आहेत. मात्र, यावेळी त्यांनी नव्या नेतृत्वावर बोलायला नकार दिला आहे.

नाना पटोलेंनी यावर सांगितलं की, राष्ट्रवादी कॉंग्रेस भाजपसोबत जाईल असं मला वाटत नाही. त्यावर भाष्य करणं योग्य नाही. उरला प्रश्न महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेचा… तर सध्या पावसाळा चालू झालेला आहे. आणि मोठ्या प्रमाणात पाऊस येतो. त्यामुळं या सभेविषयी एक मिटींग आज होणार आहे. त्यामुळं पुढील वज्रमुठ सभा होणार की नाही, हे लगेच सांगता येणार नाही. वज्रमुठ सभेविषयी बैठिकत निर्णय घेण्यात येईल, असं पटोले यांनी सांगितलं.