भाजपकडे झुकलेल्या अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादी देणार पर्याय

पुणे, ३१ मे २०२३ : शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे गेल्या काही महिन्यापासून वारंवार भाजपच्या बाजूने झुकलेली दिसून येत आहेत. ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वावड्या देखील यापूर्वी आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसने अमोल कोल्हे यांना पर्याय शोधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांचा संभाव्य उमेदवार म्हणून चर्चा केली जात आहे. मुंबईत होणाऱ्या बैठकीत अमोल कोल्हेंसह वळसे पाटील यांच्या नावाचा पर्याय ठेवण्यात आलेला आहे.

अवघ्या एका वर्षावर येऊन ठेपल्या लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आली आहे. मतदारसंघाचा आढावा, पक्षाची ताकद वाढविण्यासाठीच्या उपाययोजना, उमेदवारांची चाचपणी, जागावाटप अशा टप्प्यांवर तयारी सुरु आहे. याच तयारीचा एक भाग म्हणून मुंबई राष्ट्रवादीची लोकसभा मतदारसंघ आढावा बैठक पार पडत आहे. या बैठकीत प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचा विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेण्यात येत आहे.
पुणे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघासंदर्भात आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून संभाव्य उमेदवार म्हणून डॉ. अमोल कोल्हे आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ही दोनच नावे पक्ष संघटनेकडे आल्याची माहिती राष्ट्रवादीतील ज्येष्ठांकडून मिळाली आहेत. याआधीही वळसे पाटलांनी लोकसभा लढवावी यासाठी राष्ट्रवादीकडून आग्रह धरण्यात आला होता. मात्र, त्यांनी त्यावेळेस लढवली नव्हती. परंतु २०२४ च्या लोकसभेला शिरूरमधून निवडणूक लढवावी, असा आग्रह केला जात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

२०२४ ला लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न केला जात असून त्यासाठी त्यांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. यामुळेच धनंजय मुंडे, छगन भुजबळ तसेच अनेक ज्येष्ठ नेत्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची रणनीती आखण्यात येत असल्याचे समजते, याचाच भाग म्हणून दिलीप वळसे पाटील यांचेही नाव पुढे आलं आहे.

वळसे पाटील यांची शरद पवार यांच्या अत्यंत विश्वासू सहकार्यांपैकी एक आहेत. शिवाय ते याच मतदारसंघातील अर्थात आंबेगावचे असल्याने त्यांच्या नावावर एकमत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते पुणे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघाबाबत काय रणनीती आखतात आणि कुणाला शिरूरमधून उमेदवारी दिली जाईल, हे आत्ताच सांगता येणार नाही. मात्र, सध्या तरी अमोल कोल्हे यांच्या पाठोपाठ वळसे पाटलांच्या नावाची जोरदार चर्चा होत आहे.

दरम्यान, शिरूर लोकसभा मतदारसंघात अलीकडच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशीच लढत पाहायला मिळाली. शिवसेनेकडून शिवाजी आढळराव पाटील यांनी दोन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलं आहे. तर, त्यांना २०१९ च्या निवडणुकीत कोल्हेंकडून पराभव स्वीकारावं लागला होता. मात्र त्यानंतर राजकीय परिस्थितीमध्ये मोठा बदल झाला आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर महाविकास आघाडी विरुद्ध भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना असा सामना होणार आहे. अशात उद्धव ठाकरे यांना शिरुरची जागा जागा राष्ट्रवादीला सोडावी लागू शकते, यामुळे आढळराव पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशही केला आहे. परंतु या मतदारसंघात भाजपकडून ताकद लावली जात असल्याने नेमकी ही जागा शिंदे यांच्या शिवसेनेला सुटते की भाजप स्वतःच लढवते हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, अमोल कोल्हे हे शिरूर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार असतील अशाही चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत आहेत. त्यामुळे आगामी काळात या ठिकाणी काय होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.