कॅन्टोन्मेंटचे महापालिकेत विलिनीकरण, करा अन्यथा निवडणूक घ्या; आपच्या मुकुंद किर्दत यांची मागणी

पुणे, १८ मार्च २०२३ : लोकशाही पेक्षा एकाधिकारशाहीवर केंद्रातील भाजपची जास्त भिस्त आहे त्यामुळेच कँटोन्मेंटच्या निवडणुका लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष व प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी केला. तसेच कॅन्टोन्मेंट मध्ये गेल्या दोन वर्षांपासून निवडणुका न झाल्याने तेथील नागरी समस्यांच्या प्रश्न गंभीर झालेला आहे. त्यामुळे महापालिकांमध्ये विलीन करा अन्यथा त्यांच्या निवडणुका घेऊन विकासाचा मार्ग मोकळा करा अशी मागणी ही किर्दत यांनी केली आहे.

पुणे कॅन्टोन्मेंट, खडकी कॅन्टोन्मेंटसह देशातील ५७ कॅन्टोन्मेंटच्या निवडणुका शुक्रवारी अचानक रद्द झाल्या आहेत. दोन वर्षापेक्षा अधिक काळ या ठिकाणी निवडणूक न झाल्यामुळे नागरिकांच्या अनेक समस्याना उत्तरे मिळत नाहीत. तसेच सर्व कँटोन्मेंट बोर्डला निधी कमतरता ही मोठी समस्या आहे. त्यामुळे अनेक विकास कामे रखडली आहेत. त्यावर आवाज उठवला जात नाही. यातील काही रहिवासी भाग महानगरपालिकेला जोडले जाणार अशी चर्चा अनेक वर्षांपासून आहे. परंतु त्याबाबत निश्चित असे धोरणात्मक निर्णय घेतले जात नाहीत.

खडकी सारखे कँटोन्मेंट बोर्ड मध्ये तर लोकसंख्या कमी होत चाललेली दिसते आहे. जुन्या इमारतींचे बांधकाम रखडलेले आहे. केंद्रीय संरक्षण मंत्रालय याबाबतीत अत्यंत ढिसाळ असल्याने आणि आता लोक प्रतिनिधी नसल्याने जनतेच्या समस्या सुटत नाहीत, निर्णय घेतले जाात नाहीत. रहिवासी परिसर विलीनीकरण लवकर करा अन्यथा निवडणुका घ्यव्यात, याबाबत केंद्र सरकारने तातडीने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी आम आदमी पक्ष करत असल्याचे मुकुंद किर्दत यांनी सांगितले.

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप