मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची होणार एसआयटी चौकशी; फडणवीसांवरील टीका भोवणार – विधानसभा अध्यक्षांनी केली घोषणा

मुंबई, २७ फेब्रुवारी २०२४ : मराठा आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्रात तापला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या काही वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. यामुळे मनोज जरांगेंविरोधात सत्ताधाऱ्यांनी भूमिका घेतली आहे. मनोज जरांगेंना कोणाचं पाठबळ आहे, याची चौकशी करा, अशा मागणीला जोर धरला होता. आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजपा नेते आशिष शेलार यांनी हा विषय सभागृहात उपस्थित केला. यावरून सभागृहात प्रचंड खडाजंगी झाली.

“महाराष्ट्रात काहीतरी भयंकर घडण्यासाठी कट रचला जातोय, अशी परिस्थिती आहे. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. महाराष्ट्र बेचिराख करण्याच्या भूमिकेविरोधात या सदनात नाही बोलणार तर कुठे बोलणार?” असा प्रश्न आशिष शेलारांनी उपस्थित केला.

महाराष्ट्र बेचिराख करायची भाषा कोणी करत असेल तर त्या भूमिकेविरोधात विरोधक उभे राहतील, असा आमचा विश्वास आहे. महाराष्ट्र बेचिराख करण्याची केवळ धमकी आहे का? यामागची भूमिका काय? त्यासाठी कटकारस्थान-योजना केली आहे का? याबाबत गांभर्याने विचार करावा लागेल. कारण, आता मराठा समाजाचीही बदनामी होतेय”, असंही ते म्हणाले.

“आम्ही शांततेत आणि शिस्तीत मोर्चे काढले. पण त्याला आता गालबोट लागतंय. अन्य कोणत्याही समाजाला नख न लावता मराठा समाजाचं आरक्षण आणि हित जपलं पाहिजे, अशी मागणी होती. परंतु, उपमुख्यमंत्र्यांबाबत अपशब्द वापरला, ऐकेरी उल्लेख केला. मानसन्मानाच्या बाबतीत फडणवीसांनी कधी ब्र काढला नाही. कायदा सुव्यवस्था, राज्य सरकार आणि भारताविरोधात फडणवीस कधी बोलत नाहीत. पण तरीही उपमुख्यमंत्र्यांना निपटून टाकण्याची भाषा केली जाते. एका मंत्र्यापासून उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत हे पोहोचलं. हे चाललंय काय?”, असा संतप्त प्रश्न शेलारांनी विचारला.

“या घटनेचा घटनाक्रम सरळ नाही. देवेंद्रजींच्या विरोधात बोलण्याच्या आदल्या दिवशी यांच्या पक्षाचे प्रवक्ते पोपटलाल बोलले. सकाळी ९ वाजता भाजपाला एका दिवसात संपवू असं एकजण म्हणाले. आणि दुसऱ्या दिवशी मनोज जरांगेंनी उपमुख्यमंत्र्यांविरोधात भूमिका घेतली. याविरोधात कटकारस्थान आहे का?” असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.