तुम्हाला मोदींच्या मंत्रिमंडळात जाणारा खासदार पाहिजे की विरोधातील बाके वाजविणारा – राज ठाकरेंची कणकवलीत नारायण राणे यांच्यासाठी सभा

कणकवली, ४ मे २०२४ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी बिनशर्त पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी आज कणकवलीत नारायण राणे यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. या सभेत त्यांनी महायुतीला पाठिंबा का दर्शवला याबाबत पुन्हा एकदा माहिती दिली. तसंच, नरेंद्र मोदी सरकारमुळेच राम मंदिर होऊ शकलं, असंही राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे म्हणाले, यावेळी मी ठरवंल होतं की मुलाखती द्यायच्या नाहीत. पाठिंबा जाहीर केल्यानंतर ही माझी पहिली जाहीरसभा. २०१४ ते २०१९ च्या दरम्यान मोदींकडून ज्या गोष्टी झाल्या, ज्या मला पटल्या नाहीत त्याबाबत मी २०१९ च्या सभेत स्क्रीनवर दाखवून जाहीर विरोध केला होता. काही गोष्टी मला पटल्या. पण काही गोष्टी पटल्या नाहीत. आजही नाही पटत. आणि मला असं वाटतं की या बाबतीत आपण मोकळं असणं गरजेचं आहे. या गोष्टी पटलेली नाही. या गोष्टी पटल्या. मग नोटबंदीची असेल. पुतळ्यांची असेल. अनेक गोष्टींची असेल. ज्या गोष्टी पटल्या नाहीत त्या नाहीच पटल्या. ज्या पटल्या त्यांचं जाहीर कौतुक करणारा माणूस मी आहे.”

नरेंद्र मोदींचं सरकार आणि त्याकाळतलं सुप्रिम कोर्ट यांच्यामुळेच राम मंदिर उभं राहिलं आणि कारसेवकांच्या आत्म्याला शांती मिळाली, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले. मित्राचीही खरडपट्टी काढायला आपण मागे पुढे पाहता कामा नये आणि दुश्मनाची स्तुती करताना मागे पुढे पाहू नये”, असंही राज ठाकरे म्हणाले.

“एकतर तुम्ही मोदींच्या बाजूने असता किंवा विरोधात असता. मी २०१९ ला जे बोललो आहे ते आजच्या विरोधी पक्षांत बोलायची हिंमत नाही. माझा हेतू स्पष्ट होता, उद्देश पारदर्शी होता. जर समजा अडीच वर्षाचं मुख्यमंत्री पद भाजपाने मान्य केलं असतं तर आज बोलला असतात का हे, असा प्रश्नही त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारला. “जे आज बोलत आहात ते बोलला असतात का. कारण सत्तेचा बोळा कोंबला असता. ती गोष्ट हिरावून घेतली म्हणून आग लागली”, अशीही टीका त्यांनी केली.

२०१४ ते २०१९ मध्ये सत्तेत बसला होतात. २०१९ ते २०२२ पर्यंत मुख्यमंत्री होतात. महाराष्ट्रात साडेसात वर्षे उद्धव ठाकरे सत्तेत होते. मग उद्योगधंदे का गेले बाहेर? यांचा खासदार विरोध करणार आणि आमदार पाठिंबा देणार. आपण का विरोध करतो ते तरी माहितेय का? असा प्रश्नही त्यांनी विचारला.