आमदार अपात्रतेच्या निकालावर महाविकास आघाडीचे जागावाटप ठरणार – पृथ्वीराज चव्हाण यांची माहिती

पुणे, १० जानेवारी २०२४: कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज (१० जानेवारी) लागणाऱ्या आमदार अपात्रतेच्या निकालावर आणि महाविकास आघाडीच्या आगामी निवडणुकांसाठी जगा वाटपावर मोठं विधान केलं आहे. आमदार अपात्रतेबाबत ते म्हणाले की, भाजपला नेतृत्व बदल करायचा असेल तर त्यांच्याकडे आज संधी आहे. तसेच जागा वाटपाची चर्चा मीडिया समोर नाही बंद खोलीत झाली पाहिजे. असंही यावेळी चव्हाण म्हणाले आहेत.

आमदार पात्रतेचा निर्णय हा सर्वच पक्षांसाठी महत्त्वाचा राजकीय निर्णय ठरणार आहे. पक्षांतर बंदी कायद्याचं उद्दिष्ट सध्या साध्य होत नाहीये. त्यामुळे हा कायदा बदलायला हवा. तसेच शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणामध्ये पक्षांतर झालेलं आहे. त्यामुळे त्यांना निलंबित केले पाहिजे. मात्र यामध्ये सर्वात मोठी त्रुटी आहे ती म्हणजे न्यायाधीश म्हणून नेमलेल्या व्यक्ती हा विधानसभेचा अध्यक्ष असतो. तो कुठल्यातरी राजकीय पक्षाचा असल्याने त्याचा प्रभाव या निर्णयावर पडतो.
त्यामुळे निकालाला दीड वर्ष वेळ लागला. बरोबर भाजपला एकनाथ शिंदेंऐवजी राज्यात आगामी निवडणुका लढण्यासाठी दुसरे नेतृत्व हवं असल्यास ती देखील संधी या निर्णयातून भाजपला मिळू शकते. ही या निर्णयाची राजकीय बाजू आहे. तर यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदावर बोलताना म्हटलं की, आपण काहीही सांगू शकत नाही. भाजप एखादं नवं नेतृत्व देखील उभं करू शकतो. ज्याप्रमाणे राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये त्यांनी केलं.

तर आगामी निवडणुकांच्या साठी महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर बोलताना चव्हाण म्हणाले की, दिल्लीमध्ये काल (९ जानेवारी) तीनही पक्षांची बैठक झाली. यामध्ये इतर मित्र पक्षांना कसं सांभाळून घ्यायचं? याची सकारात्मक चर्चा झाली. तसेच जागा वाटपाची चर्चा ही बंद खोलीत झाली पाहिजे. माध्यमांसमोर नाही. वंचित बहुजन आघाडीच्या फॉर्म्युला ठरवण्याच्या भूमिकेवर यावेळी चव्हाण यांनी स्पष्ट बोलंल आहे.