तुमची बैठक म्हणजे गरुड झेप नाही तर श्वापदांची टोळी- बावनकुळे

मुंबई, ३१ ऑगस्ट २०२३:मुंबईत होत असलेली इंडिया आघाडीची बैठक नाही तर ‘घमेंडिया‘ची बैठक आहे. उद्धव ठाकरे ज्याला तुम्ही ‘गरूड झेप‘ म्हणत आहात ती गरुड झेप नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्यासाठी, त्यांच्यावर तुटून पडण्यासाठी तयार झालेली श्वापदांचा टोळी आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना तुमच्या याच टोळीने शंभर कोटी वसुली केली, करोना काळात कोट्यवधीची कंत्राट घशात घातली. मृतदेहांसाठीच्या बॅगही त्यांच्या नजरेतून सुटल्या नाहीत, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले असून सामनामध्ये प्रकाशित झालेल्या अग्रलेखाला त्यांनी प्रत्युत्तर दिले.

तुम्ही लालूप्रसाद यादवांच्या माध्यमातून मोदीजींच्या ‘नरड्यावर बसण्याचं स्वप्न‘ बघा. पण जनता तुमच्या छाताडावर बसेल. तुम्ही मोदीजींना जेवढ्या शिव्या द्याल जनता मोदीजींवर तेवढं जास्त प्रेम करेल.

महात्मा गांधीजींनी ‘क्विट इंडिया‘चा नारा याच मुंबईतून दिला होता. त्यांच्या नाऱ्यामुळे इंग्रजांना देशातून जावं लागलं. आता पुन्हा एकदा तोच ‘क्विट इंडिया‘चा नारा देऊन तुमच्या सारख्या भ्रष्ट प्रवृत्तींना जनता कायमचं घरी बसवणार आहे.