तरुणांनो राजकीय मत मांडण्यापेक्षा मतदान करा, लोकशाही वाचवा – नरेंद्र मोदी यांचे तरुणांना आवाहन

नाशिक, ११ जानेवारी २०२४: केंद्र आणि राज्य सरकारच्या युवक आणि क्रीडा विभागातर्फे येथे आयोजित २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर आले आहेत. यावेळी मोदींनी युवाशक्तीची जाणीव करून देत देशातील लोकशाही वाचवण्याकरता येत्या निवडणुकीत राजकीय मतं मांडण्यापेक्षा मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, अमृतकाळच्या आजच्या तरुण पिढीवर माझा खूप विश्वास आहे. या कालखंडात देशातील अशी युवापिढी तयार होत आहे जी गुलामीच्या दबावात आणि प्रभावापासून मुक्त आहे. भारताची युवा पिढी आयुर्वेदाचे ब्रॅण्ड अम्बेसेडर आहे. तुम्ही तुमच्या आजी-आजोबांना विचारा. ते सांगतील, त्यांच्या काळात जेवणात बाजरीची भाकरी, कुटकी, रागी, ज्वार असायचे. पण गुलामीच्या मानसिकतेत या अन्नाला गरिबीसह जोडलं गेलं. यांना स्वयंपाकघरातून बाहेर काढलं गेलं. हेच अन्न आता मिलेट्सच्या रुपात, सुपर फूडच्या रुपात पुन्हा स्वयंपाकघरात पोहोचत आहे. सरकारने या मिलिट्सना श्री अन्नच्या रुपाने नवी ओळख दिली आहे. आता तुम्हाला श्री अन्नचा ब्रॅण्ड अम्बेसेडर बनायचं आहे. यामुळे तुमचं आरोग्यही सुधारेल आणि देशातील शेतकऱ्यांचंही भलं होणार आहे.

सक्रीय राजकारणात तरुणांचा सहभाग वाढावा
जमलेल्या तरुण समुदायाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध उदाहरणे दिली. देशाची प्रगती साधण्याकरता तरुणांनी काय केलं पाहिजे, याचं मार्गदर्शनही केलं. तसंच, देशातील लोकशाही जिवंत ठेवण्याची जबाबदारीही तरुणांची असल्याचं ते म्हणाले. मोदी म्हणाले, राजकीय माध्यमातूनही देशाची सेवा करता येईल. मी जेव्हा ग्लोबल लीडर किंवा इनोव्हेटर्सना भेटतो तेव्हा मला त्यांच्यात एक अद्भूत आशा दिसते. आशा आणि आकांक्षाचे एक कारण आहे लोकशाही. भारत लोकशाहीची जननी आहे. लोकशाहीत तरुणांचा सहभाग जितका अधिक असेल तितके राष्ट्राचे भविष्य चांगले असेल.

“घराणेशाहीच्या राजकारणामुळे देशाचं नुकसान झालं आहे. लोकशाहीमध्ये सहयोगाचा आणखी एक महत्त्वपूर्ण प्रकार आहे. तुम्ही तुमचं मत मतदानाच्या रुपाने द्यायचं आहे. तुमच्यापैकी अनेकजण असे असतील जे येत्या निवडणुकीत पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. फर्स्ट टाईम व्होटर्स आपल्या लोकशाहीत नवी उर्जा आणि शक्ती आणू शकतील. यामुळे मत करण्यासाठी तुमचं नाव लिस्टमध्ये येण्यासाठी लवकरात लवकर सर्व प्रक्रिया पूर्ण करा. तुमच्या पॉलिटिकल व्हुयजपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे तुमचं मतदान. २५ वर्षांचं हे अमृतकाल तुमच्यासाठी कर्तव्यकालसुद्धा आहे”, असंही मोदी म्हणाले.