सह्याद्री वाहिनीवरून मराठीत कार्यक्रम प्रदर्शित करा राज ठाकरे यांचे दूरदर्शन ला पत्र

मुंबई, २१ जुलै २०२२: सह्याद्री वाहिनीसंदर्भात एक पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दूरदर्शनच्या अप्पर महासंचालकांना पाठवलं आहे. सह्याद्रीवर मराठी भाषेतील कार्यक्रमच प्रसारित करण्यात यावेत अशी मागणी या पत्राद्वारे राज यांनी केलीय. राज यांचे हे पत्र मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संजय चित्रे यांनी बुधवारी प्रसारण भवन येथे दूरदर्शनचे अप्पर महासंचालक असलेल्या नीरज अग्रवाल यांना दिलं. याच विषयासंदर्भात मनसेच्या नेत्यांनी पक्षाची भूमिका अग्रवाल यांना समजावून सांगितली. सध्या या वाहिनीवर मराठीबरोबरच इतर भाषांमधील कार्यक्रमही प्रसारित केले जात असून त्यासंदर्भात सर्वसामान्यांच्याही तक्रारी असल्याचं मनसेनं म्हटलंय.

राज ठाकरेंनी अप्पर महासंचालकांना लिहिलेल्या दोन पानी पत्रामध्ये आपली भूमिका सविस्तरपणे मांडली आहे. यामध्ये अगदी सह्याद्री वाहिनीची सुरुवात कधी झाली इथपासून दाक्षिणात्य राज्यांमधील भाषाप्रेमाबद्दलच्या मुद्द्यापर्यंतच्या अनेक मुद्द्यांचा उल्लेख राज यांनी केला आहे. तसेच पत्राच्या शेवटी हिंदी भाषेमधून सह्याद्रीवर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांऐवजी मराठी भाषेतील कार्यक्रम प्रदर्शित करावेत या मागणीचा नक्की विचार करावा अशी विनंती करतानाच असं झालं नाही तर मनसे हा प्रश्न सोडवण्यासाठी योग्य ती पावलं उचलेल असा इशाराही राज यांनी दिलाय. तसेच या पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचाही उल्लेख आहे. पत्रात नेमकं काय म्हटलंय पाहूयात…

दूरदर्शनने दिनांक १५ ऑगस्ट १९९४ रोजी महाराष्ट्रासाठी सह्याद्री मराठी प्रादेशिक वाहिनी सुरु केली. त्याचा मूळ उद्देश हा मराष्ट्राच्या राज्यातील राजभाषेत म्हणजे मराठीत सर्व कार्यक्रमांचे प्रक्षेपण व्हावे हा आहे. मात्र सध्या या वाहिनीवर अनेकदा इतर भाषेतील कार्यक्रम प्रसारित केले जात असल्याचं प्रेक्षकांच्या व आमच्या नजरेस आले आहे. याबाबत सर्वसामान्यांच्या आमच्याकडे तक्रारी आल्या. तसेच याबाबत माहिती अधिकार कायद्यान्वये महिती घेतली असता त्यात ही बाब उघड झाली. तश्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मन की बात’ हा हिंदी भाषेतील कार्यक्रम सह्याद्री तसेच दूरदर्शनच्या इतर सर्व प्रादेशिक वाहिन्यांवरुन दाखवला जातो. त्याबाबत कुणाचा आक्षेप असण्याचे काहीच कारण नाही कारण ते देशाचे पंतप्रधान आहेत. मात्र ‘कोशिस से कामयाबी तक’, ‘तराने पुराने’ हे हिंदी कार्यक्रम आपल्या मराठी सह्याद्री वाहिनीवर दाखवले जातात तसेच ते पुन:प्रसारीतही केले जातात. त्याचप्रमाणे सह्याद्री वाहिनीवरील मुलाखत किंवा संवादात्मक कार्यक्रमांमध्येही काही वेळा हिंदी वक्ते किंवा हिंदी भाषेतून संवाद साधणाऱ्या व्यक्तींना निमंत्रित केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. हे निश्चितच मूळ उद्देशाला धरु नाही.