पंतप्रधान पदाचा उमेदवार नसतानाही १९७७ ची निवडणूक जिंकली – शरद पवार

अकोला, २७ डिसेंबर २०२३: पुढील वर्षात देशात लोकसभा निवडणुका होणार आहेत. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. भाजपकडून पंतप्रधान पदासाठी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी हेच चेहरा असणार आहेत. मात्र, अद्याप विरोधकांच्या इंडिया आघाडीने पंतप्रधान पदाचा चेहरा ठरवला नाही. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पंतप्रधान मोदींविरोधात इंडिया आघाडीकडे चेहराच नाही, त्यांनी आधी चेहरा ठरवावा, असा टोला लगावला होता. त्यावर आता राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी भाष्य केलं.

पवार यांनी आज अकोल्यात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना अजित पवारांनी केलेल्या टीकेविषयी भाष्य केले. पवार म्हणाले, मोदींच्या विरोधात चेहरा नाही ठीक आहे, त्यांना तसं वाटतं. ते टीका करू शकतात. मात्र, निवडणुक लढवण्यासाठी चेहऱ्याची आवश्यकता असल्याचं काही कारण नाही. निवडणुकीपूर्वी पंतप्रधान पदाचा चेहहरा जाहीर न केल्यास काहीही फरक पडणार नाही. १९७७ सालच्या निवडणुकीत पंतप्रधान पदासाठी कोणताही चेहरा जाहीर करण्यात आला नव्हता. निवडणुक झाल्यावर मोरारजी देसाई यांची निवड करण्यात आली. देसाईंचा चेहरा वापरून १९७७ सालची निवडणूक लढली गेली नाही. त्यामुळं २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी देखील पंतप्रधान पदासाठी चेहरा जाहीर न केल्यास काही फरक पडणार नाही, असं पवार म्हणाले.
मायावतींना इंडिया आघाडीत घेणार का, या प्रश्नावर बोलतांना पवार म्हणाले, मायावतींचा महत्वाचा रोल उत्तरप्रदेशध्ये आहे. मात्र, आमचा सहकारी पक्ष म्हणजे समाजवादी पक्ष उत्तर प्रदेशामध्ये मजबूत आहे. समाजवादी पार्टीला दुखावून आम्ही अन्य कुणाला सोबत घ्यायचा विचार करत नाही, असं पवार म्हणाले.

राम मंदिरावरून भाजप आणि ठाकरे गट यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. बाबरी पाडले तेव्हा भाजपवाले पाय लावून पळाले होते,अशी टीका संजय राऊतांनी केली. तर बाबरी शिवसेनेने नाही, तर भाजपने पाडली, असं भाजप नेते सांगत आहेत. यावरही पवारांनी भाष्य केलं. ते म्हणाले, जेव्हा बाबरी मशीद पाडली गेली. त्यावेळी देशात एकच नेते असे होते, ज्यांनी म्हटलं की, बाबरी आम्ही पाडली. बाकी असं कुणी काही बोललं नाही. त्यामुळं बाबरी पाडण्यात शिवसेनेची भूमिका होती की, याबद्दल वाद घालण्यात काहीही अर्थ नाही. शिवसेनेची भूमिका आम्ही स्वत: बाळासाहेबांच्या वक्तव्यांमधून ऐकली आहे. मंदिर झालं, याचा आम्हाला आनंदच आहे. मंदिर होण्यासाठी अनेकांचं योगदान आहे, असंही पवार म्हणाले.