मराठा आरक्षणाच्या नावाखाली रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा केली स्थगित

शिरुर, २७ ऑक्टोबर २०२३: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी युवकाच्या प्रश्नावर युवा संघर्ष यात्रा काढली होती. आता त्यांनी ही यात्रा काही काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न तीव्र झाला आहे. अनेक ठिकाणी आरक्षणासाठी गावबंदीचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. दसऱ्याच्या दिवशी पुण्यातून ही यात्रा काढण्यात आली होती. परंतु आता तिसऱ्याचा दिवशी ही यात्रा स्थगित झाली आहे. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुणे ते नागपूर तब्बल आठशे किलोमीटरची ही युवा संघर्ष यात्रा होती. त्यात युवकांची बेरोजगारी, स्पर्धा परीक्षा यासह अनेक प्रश्नासाठी ही यात्रा होती.

आज माध्यमांशी बोलतांना रोहित पवार यांनी सांगितले की, मनोज जरांगेंनी सरकारला दिलेली चाळीस दिवसांची मुदत संपली असून अद्याप आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही. त्यामुळं त्यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं. त्यांना राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. राज्यातील वातावरण वेगळ्या दिशेने जाणार नाही, यासाठी युवा संघर्ष यात्रा काही काळासाठी संघर्ष यात्रा स्थगित केली, असं रोहित पवार म्हणाले.

आमदार संदीप क्षीरसागर, रोहित पाटील, जयदेव गायकवाड व राज्यातील विविध जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रोहित पवार यांनी हा निर्णय जाहीर केला.

गावंबदी आहे, म्हणून संघर्ष यात्रा थांबवत नाही. महाराष्ट्र अस्वस्थ आहे. आत्महत्या होत आहे. आम्ही संवेदनशील आहोत. आमची मुलं आत्महत्या करतात. ज्यांच्यासाठी ही यात्रा काढली, ते युवा अस्वस्थ असताना ही यात्रा सुरू ठेवणे योग्य नाही. त्यामुळं आम्ही ही यात्रा स्थगित करतोय, असं रोहित पवार यांनी स्पष्ट केलं.
रोहित पवार म्हणाले, राज्यातील तरुण आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत आहे. आज सकाळी यात्रेचा टप्पा जिथे संपली तिथेच आम्ही थांबलो आहोत. महाराष्ट्रातील वातावरण अस्वस्थ झाले आहे. अशा परिस्थितीत राज्यातील शांतता धोक्यात येऊ नये, यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असंही रोहित पवार म्हणाले.

ते म्हणाले, मराठा आरक्षणासाठी एक सच्चा कार्यकर्ता लढतोय, त्याला आपणही पाठिंबा दिला पाहिजे, अशी चर्चा आमच्यात झाली. त्यामुळं जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी पायी चालत असतांना आम्हीही अन्न सोडण्याचा निर्णय घेतला. याचा काही परिणाम होऊन सरकार निर्णय घेईल, असे वाटले होते. मात्र, सरकारने कुठलाच निर्णय घेत नाही, असं टीकास्त्र रोहित पवारांनी डागलं.

यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली. पंतप्रधानांनी काल शिर्डीत बोलताना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणतीही भूमिका घेतली नाही, असंही ते म्हणाले.