प्रकाश आंबेडकर नाना पटोलेंवर चिढले – तुम्हाला अधिकार नसताना पत्र पाठविल्याचा विचारला जाब

मुंबई, २५ जानेवारी २०२४ : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला आमंत्रण दिले.
पण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना अधिकार नसतानाही त्यांच्या स्वाक्षरीने अॅड. प्रकाश आंबेडकर यांना पत्र पाठविल्याने त्यांनी तुम्हाला असे पत्र पाठविण्याचा अधिकार आहे का? असा जाब विचारला. नाना पटोले यांच्या डोक्यात लोचा झाला आहे का? अशी टीकाही आंबेडकर यांनी केली आहे.

वंचितने थेट पत्र काढून नाना पटोले यांना इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीबद्दल निर्णय घेण्याचे अधिकार नसताना वंचितला निमंत्रण कसं काय दिलं? असा थेट सवाल अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची आज २५ जानेवारीला बैठक होणार होती. त्या बैठकीसाठीचं पत्र वंचितला देण्यात आलं होतं. त्या पत्रावर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या सह्या होत्या. त्यावर वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आक्षेप घेत घणाघाती टीका केली आहे.

‘वंचित’ने आपल्या पत्रात म्हटलं आहे की, असं वाटतंय की तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेसोबत मनाचे खेळ खेळत आहात किंवा तुमच्या डोक्यात लोचा झाला आहे. एकीकडे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथाला यांनी मंगळवार 23 जानेवारी रोजी काँग्रेस भवन पुणे येथे पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्टपणे म्हटले की, निवडणुका जाहीर झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत सामील करण्यात येईल, जिथे तुम्ही बाजूलाच बसला होतात.

तुमच्या पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्या इतर दोन जणांनी त्यांच्यासोबत झालेल्या बैठकांमध्ये अगदी स्पष्टपणे मला सांगितले आहे की, काँग्रेस हाय कमांडने महाराष्ट्रातील युतीसंदर्भात कोणतेही निर्णय घेण्याचे अधिकार तुम्हाला दिलेले नाहीत.

शिवसेनेसोबत झालेल्या बैठकांमध्ये मला सांगण्यात आले आहे की, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व संभाषण राहुल गांधी किंवा मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबतच करतात आणि त्या चर्चांमध्ये तुम्हाला सहभागी केले जात नाही, कारण महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीच्या युतिसंदर्भात निर्णय घेण्याचे कोणतेही अधिकार तुम्हाला देण्यात आलेले नाहीत.

काँग्रेस हाय कमांडने महाराष्ट्रात युतिसंदर्भात निर्णय घेण्याची परवानगी तुम्हाला दिली आहे का? असा सवालही या पत्राद्वारे प्रकाश आंबेडकर यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना केला आहे.

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष अर्थात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी सहिनिशी सन्मानपूर्वक निमंत्रण द्यावे किंवा रमेश चेन्नीथाला, राहुल गांधी, सोनिया गांधी किंवा मल्लिकार्जुन खरगे यापैकी कोणीही वंचित बहुजन आघाडीला बैठकीसाठी बोलावल्यास कोणताही संकोच न ठेवता आम्ही त्यात सहभागी होऊ असे जाहीरपणे वंचित आघाडीकडून सांगण्यात आले आहे.

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप