रोहित पवारांच्या कंपनीवर प्रदूषण महामंडळाचा छापा, 72 तास प्रकल्प बंद

मुंबई, २८ सप्टेंबर २०२३: राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर रात्री २ वाजता महाराष्ट्र प्रदूषण विभागाची कारवाई, पुढच्या ७२ तासात प्लांट बंद करण्याची प्रदूषण नियामक महामंडळांची सूचना. राष्ट्रवादीतील फुटीनंतर आपण सत्याच्या आणि शरद पवारांच्या बाजूनं उभं राहिल्यानं सूडबुद्धीनं शिंदे-फडणवीस-पवार सरकारनं कारवाई केल्याचा रोहित यांचा आरोप आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर रोहित पवार हे शरद पवार यांच्या बाजूने भक्कमपणे उभे आहेत. ते वारंवार शिंदे फडणवीस अजित पवार सरकारला टार्गेट करत असून नोकर भरती, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महागाई यासह अनेक विषयांवर ते त्यांना घेरून त्यांच्यावर टीका करत आहेत. त्यामुळे रोहित पवार सध्या सत्ताधाऱ्यांच्या निशाणावर आहेत त्यातच. आता रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो या कंपनीत छापा टाकल्याने राजकारण तापले आहे. या संदर्भात रोहित पवारांनी सविस्तर पोस्ट करून त्यांची भूमिका स्पष्ट केली आणि सरकारवर टीका केली आहे.

दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून कुठला तरी द्वेष मनात ठेवून आज पहाटे दोन वाजता एका शासकीय विभागाच्या माध्यमातून माझ्या कंपनीच्या एका विभागावर कारवाई करण्यात आली.

युवा मित्रांना एकच सांगू इच्छितो की, संघर्ष करतांना भूमिका घेताना अनेक अडचणींचा सामना करावाच लागतो. मी बोलतो, ठोस भूमिका घेतो म्हणून मला अडचणीत आणण्यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत, परंतु अडचणी आल्या म्हणून संघर्ष थांबवायचा नसतो. भूमिका आणि निष्ठा बदलायची नसते ही मराठी माणसाची खासियत आहे.

हा लढा मी लढणारच आहे, परंतु ज्यांच्या सांगण्यावरून माझ्यावर कारवाई करण्यात येत आहे त्यांना एकच सांगायचंय की, मी आधी व्यवसायात होतो नंतर राजकारणात आलो, परंतु आधी राजकारणात येऊन आणि नंतर व्यवसायात आर्थिकदृष्ट्या बलाढ्य झालेले अनेक जण आहेत. त्यामुळे या नेत्यांना अपेक्षित असलेले काहीही साध्य होणार नाही. तसेच हे द्वेषाचं राजकारण आजच्या पिढीला पटणारंही नाही.

आपण सत्याच्या बाजूने आहोत आणि केवळ राजकीय सुडापोटी ही कारवाई होत असल्याने माझ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आणि कुटुंबाने काळजी करण्याची गरज नाही. माझ्या वाढदिवसानिमित्त ‘गिफ्ट’ दिल्याबद्दल सरकारचे आभार मानतो, परंतु राज्यातली युवा आणि जनता सरकारला नक्कीच ‘रिटर्न गिफ्ट’ देईल, ही खात्री आहे.

असो!
पण सर्वसामान्यांच्या कामाला महिनोन्-महिने सुस्ती दाखवणारी यंत्रणा या दोन नेत्यांच्या इच्छेसाठी माझ्यावर कारवाई करताना खूप तत्परता दाखवते, याचा मात्र नक्कीच आनंद आहे. या सर्व प्रक्रियेत शासकीय अधिकाऱ्यांना मी कुठलाही दोष देत नाही. न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास असून सत्याच्या आधारे न्यायालयात माझा लढा सुरूच राहील, असे आमदार रोहित पवार यांनी नमूद केले आहे.