मराठी तरुणीला मुंबईत घर नाकारले ;राजकारण तापले

मुंबई, २७ सप्टेंबर २०२३: मुंबईतल्या मुलुंड या उपनगरात तृप्ती देवरुखकर यांना घर नाकारण्यात आलं. त्यानंतर आता यावरुन सरकारवर टीका होते आहे. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आता तरी सरकार कारवाई करणार का? की दिल्लीश्वरांपुढे झुकणार? की ज्यांनी हे केलं त्यांना थँक यू म्हणणार? असे प्रश्न विचारले आहेत. तर काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही या प्रकरणावरुन सरकारवर टीका केली आहे.

सरकाराची दादागिरी मराठी माणसाच्याच संदर्भात चालली आहे. मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करायचं आहे. काही समाजांनी ही पावलं उचलली आहे. मतांची आणि सत्तेची लाचारी आहे. त्यामुळे कारवाई होत नाही. गुजराती समाजाची हुजरेगिरी केल्याशिवाय या सरकारला पर्याय नाही. कारण गुजरातची हुजरेगिरी हा सरकारचा धंदा आहे. मराठी माणूस मेला काय? वाचला काय? त्याचा हक्क हिरावला गेला काय? यांना काहीही घेणं नाही. कुठल्याही समूहाच्या, जातीच्या माणसाला महाराष्ट्रात, मुंबईत कुठे राहण्याची मुभा आहे. मात्र विष पेरलं गेलं आणि आता त्याचे वृक्ष येत आहेत. समाज आणि मराठी माणसाला नेस्तनाबूत केलं जातं आहे. अशा प्रवृत्तीवर कारवाई झाली पाहिजे. सरकारला लाज वाटत असेल तर त्यांनी दखल करुन कारवाई करावी अशी आमची मागणी आहे असं वडेट्टीवार म्हणाले.

मुंबईतल्या मुलुंड या उपनगरात तृप्ती देवरुखकर या महिलेने त्यांना आलेला घर घेण्याबाबतचा अनुभव हा त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला. ज्यानंतर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. या व्हायरल व्हिडीओनंतर मनसेने तातडीने संबंधित सोसायटीमध्ये धाव घेत आपल्या स्टाईलने मराठी माणसाला घर नाकारणाऱ्यांना इशारा दिला. ज्यानंतर या लोकांनी माफी मागितली आहे.

“जितके म्हणून राजकीय पक्ष आहेत त्या सर्वांनी मराठी पाट्या काढा. मराठी माणसाचा राजकीय वापर करणं बंद करा. मुंबईत मराठी माणसाची काय किंमत आहे ते जाणवलं. मुलुंड वेस्टमध्ये शिवसदन सोसायटीत ऑफिससाठी जागा पाहायला गेल्यानंतर गुजराती सेक्रेटरीने मराठी माणसांना घरं देणार नाही असं सांगितलं. नियमावली मागितली तर धमकी दिली. पोलिसांना सांगा नाहीतर आणखी कुणाला सांगा असं सांगत हात पकडला आणि माझ्या पतीला धक्काबुक्की केली. शूट करायला गेले तर फोन काढून घेतला. यांना एवढा माज आलाय की महाराष्ट्रात राहून मराठी माणसाला सांगतात की तुम्हाला सोसायटीत परवानगी नाही. मराठीच्या नावावर राजकारण करणारे कुठे आहेत? अशा माणसांना पोसत असाल तर दुर्दैव आहे. हे माझं रडणं नाही तर संताप आहे. आज मला जो अनुभव आला तो किती मराठी माणसांना आला असेल? किती जणांना घरं नाकारली गेली असतील?” असे प्रश्न विचारत तृप्ती देवरुखकर यांनी व्हिडीओ पोस्ट केला. जो चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर मनसेचे नेते, पदाधिकारी या सोसायटीत पोहचले. त्यांनी इशारा दिल्यानंतर या सोसायटीतल्या लोकांनी माफी मागितली. यानंतर आता मनसेने आणखी एक व्हिडीओ पोस्ट करत आपलं म्हणणं मांडलं आहे, याबाबत आता टीका होऊ लागली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही यावरुन सरकारला लक्ष्य केलं आहे.