uddhav Thackeray

जागा वाटपाबाबत कोणी काही बोलूद्या, आघाडीत बिघाडी होऊ देणार नाही – उद्धव ठाकरे

मुंबई, ३० डिसेंबर २०२३: दिल्लीत झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत माझी खर्गेजी आणि राहुलजींशी बोलणी झाली. त्यामुळं सर्व सुरळीत होईल. इकडे बाहेर ज्या बातम्या येतायत, त्यावर कोणाही लक्ष देऊ नका. कारण तसा कोणताही निरोप मला त्यांच्या पक्ष श्रेष्ठींकडून आला नाही. माझ्याकडून मी आघाडीत बिघाडी होऊ देणार नाही, असा विश्‍वास ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली. मोदी सरकारचा पराभव करण्यासाठी देशभरातील विरोधी पक्षांनी एकजूट करून इंडिया आघाडी स्थापन केली आहे. राज्यात शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय घेतला. मात्र, अद्याप त्यांच्यात जागा वाटपाबाबत एकमत नाही. दरम्यान, यावर आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत भाष्य केले.
पत्रकारांनी महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत प्रश्न विचारला. त्यावर बोलतांना ठाकरे म्हणाले की, महाविकास आघाडीचं जागा वाटप सुरळीत होईल. राष्ट्रवादी आणि आमची बोलणी व्यवस्थित झाली आहेत. दिल्लीत झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत माझी खर्गेजी आणि राहुलजींशी बोलणी झाली. त्यामुळं सर्व सुरळीत होईल. इकडे बाहेज ज्या बातम्या येतायत, त्यावर कोणाही लक्ष देऊ नका. कारण तसा कोणताही निरोप मला त्यांच्या पक्ष श्रेष्ठींकडून आला नाही. माझ्याकडून मी आघाडीत बिघाडी होऊ देणार नाही. मी कोण काय बोलत आहे, याकडे लक्ष देणार नाही. जोपर्यंत काँग्रेसचे वरिष्ठ नेते बोलत नाहीत, तोपर्यंत मी किंवा माझ्यासोबतचे इतरही याबाबत भाष्य करणार नाहीत, असं ठाकरे म्हणाले.

कॉंग्रेसच्या प्रमुखांकडून अजून जागा वाटपाचा कोणताही प्रस्ताव आला आली, असंही ठाकरे म्हणाले. यावेळी ठाकरेंनी वंचित बहुजन आघाडीच्या सहभागाविषयीही भाष्य केलं. ते म्हणाले, आमची वंचितशीही बोलणी सुरू आहेत. एक-दोन दिवसांत आमची एकत्र बैठक होणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि वंचित अशी आघाडी करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं ठाकरे म्हणाले.

दरम्यान, महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. अशा स्थितीत जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जागा वाटपाबाबत चर्चा होणार असल्याची माहिता आहे. तीन प्रमुख पक्षांसह इतर लहान-मोठे पक्षही मविआत आहेत. त्यामुळं जागा वाटपात कुणाला किती जागा मिळतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.