महाराष्ट्र: राज्यपालांच्या राजीनाम्यावर राजभवनाचे स्पष्टीकरण

मुंबई, २८ नोव्हेंबर २०२२ः महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सातत्याने आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. यापूर्वी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याने राज्यपाल कोश्यारी हे चर्चेत आले होते. त्यामुळे राज्यपाल कोश्यारी यांना हटवण्याची मागणी करण्यात येत होती.

त्यातच आता भगतसिंह कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्याची चर्चा सुरु आहे. जवळील व्यक्तीकडे पदमुक्त होऊन आपल्या राज्यात पुन्हा जाण्याची इच्छा कोश्यारी यांनी व्यक्त केली आहे. पण, राजभवनाकडून या वृत्ताचे खंडण करण्यात आलं आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पदमुक्त होण्याबद्दल माध्यमांत सुरु असलेल्या चर्चा अफवा आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी पदमुक्त अथवा राजीनामा देण्याबाबत कोणतीही इच्छा व्यक्त केली नाही, असे राजभवनाकडून सांगण्यात आलं आहे.

गेल्या काही महिन्यांपासून राज्यपाल कोश्यारी हे वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. मुंबईतून गुजराती आणि मारवाडी लोकांनी पैसा काढून घेतला तर काही राहणार नाही. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या लग्नाबाबत… आणि नुकतेच छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील आदर्श होते, अशी विधान राज्यपाल कोश्यारी यांनी केली आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी आणि संघटनांनी राज्यपालांना हटवण्याची मागणी केली आहे.