महाराष्ट्र: एकनाथ शिंदे सरकार घटनाबाह्य, राष्ट्रवादीचे नेते राज्यपालांच्या भेटीला  

मुंबई, ०२/०८/२०२२: राज्यात एकनाथ शिंदे सरकारला येऊन महिना उलटून गेला आहे. तरीही मंत्रीमंडळाचा विस्तार झालेला नाही. याप्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही सरकावर हल्लाबोल केला होता. राज्यात अनेक जिल्ह्यात पूरपरिस्थिती आहे. शेतकरी अडचणीत सापडला आहे. बाकी खात्याचेही अनेक प्रश्न प्रलंबित आहे. घटनेनुसार दोन मंत्र्यांचे सरकार बेकायदेशीर आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस जास्तच आक्रमक झाली आहे. यापाश्र्वभूमीवर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचे शिष्टमंडळाने आज राज्यपालांची भेट घेत निवेदन दिले.

 

राज्यात अजुनही मंत्रीमंडळ विस्तार झाला नाही. राज्यातील सरकार घटनाबाह्य आहे, अशी लक्षवेदना राज्यपालांकडे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, हसन मुश्रीफांसह इतर नेते उपस्थित होते. यावर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी काय भूमिका घेतात याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. विदर्भ मराठवाडा मधील अतिवृष्टीमुळे हानी झाली आहे, त्यासाठी ताबडतोब मदत दिली पाहिजे. एक महिन्यापेक्षा जास्त काळ झाला. परंतु, मंत्रीमंडळ विस्तार होत नाही. केंद्राची टीम पाठवून पाहणी करावी अशी मागणी त्यांनी केली.