कसब्याची निवडणूक हिंदूत्वाची – देवेंद्र फडणवीस

पुणे, ता. २३/०२/२०२३: महाविकास आघाडीच्या प्रचारात जातीवादी मुद्दे उपस्थित करून नरेंद्र मोदी, आरएसएसचा पराभव करण्यासाठी देशभरातून मुस्लिमांना मतदानात आणा असे सांगितले जात आहे. कसब्याची निवडणूक आता स्थानिक मुद्द्यावर राहिलेली नाही. तर ती राष्ट्रीय विचारांची निवडणूक झाली असून, कसबा हा हिंदूंचाच आहे हे मतदार दाखवून देतील, असे आव्हान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ आयोजित महात्मा फुले मंडईतील सभेत फडणवीस बोलत होते. रिपाईचे अध्यक्ष, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, हेमंत रासने, मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक, कुणाल टिळक आदी यावेळी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, ‘‘मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे ही निवडणूक लागल्याने त्यांची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी रासने निवडणुकीत उभे आहेत. गिरीश बापट यांनी आजारी असूनही मतदारांना केलेल्या आवाहनावर आपण ही निवडणूक नक्कीच जिंकू. या निवडणुकीत भाजपवर हा समाज नाराज, तो समाज नाराज असा प्रचार करण्याचा प्रयत्न झाला. पण शरद पवार यांच्या बैठकीत मुस्लीम नेते जातीवादी टिपणी करत ‘मोदींना, आरएसएसला हरविण्याकरता देशभरातून आम्ही मुसलमानांना आणू, मेलेल्या मुसलमान देखील मतदानाला आणू हे सांगत आहे. त्यामुळे आता ही लढाई रासने धंगेकर राहिलेली नाही तर राष्ट्रीय विचारांची झाली आहे. पुण्येश्‍वर महादेवाच्या मंदिराला धंगेकर, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पाठिंबा देणार का असा प्रश्‍न फडणवीस यांनी केला.
पुण्याच्या विकासावर फडणवीस म्हणाले
– सगळ्या समाजांना एकत्रित घेऊन विकासाचा रथ पुढे नेणार .मेट्रोचे नेटवर्क, नदी स्वच्छतेचा व सुशोभीकरण प्रकल्पामुळे पुण्याचा चेहरा बदलणार. देशामध्ये सर्वाधीक इ बसेस पुण्यामध्ये असल्याने केंद्र सरकारकडून या मॉडेलचे कौतुक रिंगरोड, विमानतळाचा विस्तार ही कामे करत आहोत. विकासातून परिवर्तन घडविताना कसब्यात भाजपचा आमदार हवा

आचारसंहितेनंतर वाड्यांच्या निर्णयाची घोषणा

पेठांमधील वाड्यांचा प्रश्‍न सोडविण्यासाठी हेमंत रासने, शैलेश टिळक मुख्यमंत्र्यांना भेटले असून, वाड्यांच्या विकासातील अडथळे, नियमांचे बंधन हटवून पुनर्विकासाचा मार्ग खुला करण्याचं आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. आचारसंहिता संपल्यानंतर याचे आदेश काढले जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

एमपीएसीवरून पवारांवर टीका
एमपीएमससीचा अभ्यासक्रम बदलण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या काळात झाला, त्याविरोधात त्यांच्या काळात आंदोलने झाली त्यावेळी तोंड उघडले नाही, प्रतिसाद दिला नाही. पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमपीएससीचा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय घ्यायला लावला, असे फडणवीस यांनी सांगत नाव न घेता पवार यांच्यावर टीका केली.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप