नरेंद्र मोदी यांच्या सभेत पुण्यावर फोकस; प्राचीन पुण्यासह विकासावर भरभरून बोलले

पुणे, २९ एप्रिल २०२४ : पुणे लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचाराच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पुण्यात जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी पुण्याचं महत्त्व सांगत असताना ‘पुणे तिथे काय उणे’ या म्हणीचा उल्लेख केला. “या भूमीने महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यासारखे अनेक संतसुधारक देशाला दिले आहेत. आज ही भूमी जगाला चांगले शास्त्रज्ञ, उद्योजक देत आहे. पुणे जितकं प्राचीन आहे, तितकीच भविष्याच्या बाबतीत ताकदवान आहे. पुण्यात प्रत्येक क्षेत्राचे तज्ज्ञ उपस्थित आहेत. त्यामुळेच म्हणतात पुणे तिथे काय उणे”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले.

“काँग्रेसने देशात ६० वर्षांपर्यंत राज्य केलं. पण काँग्रेसच्या सत्ताकाळात देशातील अर्ध्यापेक्षा जास्त जनतेकडे मुलभूत सुविधा नव्हत्या. आम्हाला तर आता फक्त १० वर्षे तुमची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. पण या १० वर्षात आम्ही मुलभूत गरजांना पुर्ण केलं आहेच, सोबत प्रत्येक वर्गाची आकांक्षा पूर्ण करायला जीव ओतून काम केलं आहे. आवश्यकता आणि आकांक्षा दोन्हींच्या पूर्ततेसाठी एक व्हिजन घेऊन पुढे जात आहोत”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

“तुम्ही सुद्धा जाणता, कुणी शहरात राहा, किंवा गावात, चांगले रस्ते बघून, आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चरला बघून मन प्रसन्न होतं. मेहनत तुम्हालाही करावी लागेल. आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चरने आपल्याला विश्वास निर्माण होतो. इथे पुणे मेट्रो पाहा, पुणे विमानतळाचं पालटलेलं नवं रुप पाहा, पालखी मार्ग पाहा, समृद्धी महामार्ग बघा, प्रत्येक जागेला कनेक्ट करणारी सेमी हायस्पीड वंदे भारत ट्रेन बघा, हे सर्व आधुनिक होणाऱ्या भारताची प्रतिमा आहे. जीवंत पुरावा आहे. पुणेकरांनो लिहून घ्या, महाराष्ट्राच्या माझ्या बंधू-बघिणींनो ही मोदीची गॅरंटी आहे, तो दिवस येणारच आहे, जेव्हा तुम्ही देशाच्या पहिल्या बुलेट ट्रेनने प्रवास करणार”, असं आश्वासन नरेंद्र मोदींनी दिलं.

“काँग्रेसने आपल्या १० वर्षात इन्फ्रास्ट्रक्चरवर जेवढा खर्च केला, पुणे कोणतीच गोष्ट विसरत नाही. आकडा लक्षात ठेवा. डॉ. मनमोहन सिंह यांचं जे रिमोटवालं सरकार होतं त्या सरकारने १० वर्षात इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च केला तेवढा खर्च आम्ही १ वर्षात करतो. आजचा भारत आपल्या युवकांचे संशोधन, टॅलेंट आणि टेक्नॉलिजवर विश्वास ठेवून पुढे जात आहे. स्टार्टअप इंडियाचं कमाल पाहा, फक्त १० वर्षात भारतीय युवकांनी सव्वा लाखापेक्षा जास्त स्टार्टअप बनवले आहेत. गर्वाची बाब म्हणजे यापैकी अनेक हे आपल्या पुण्यातील तरुण आहेत”, अशी माहिती नरेंद्र मोदींनी दिली.

“आम्ही जे नीतीनुसार बदल केले आहेत त्याचा परिणाम मॅपिंगच्या क्षेत्रात बघायला मिळत आहेत. माझ्या देशाचे तरुण त्यात पुढे जात आहेत. अवकाश, सुरंक्षा विभाग, उद्योग अशा विविध विभागात प्रगती सुरु आहे. पुण्यात बुद्धिमान तरुण आहेत. आम्ही १ लाख कोटी रुपये, जे लोक इनोवेशन करु इच्छित आहेत त्यांना डोळे झाकून देण्याचा निर्णय घेतला आहे. देश जगातही आपली चमक दाखवत आहे”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

“१० वर्षांपूर्वी भारतात मोबाईल आयत करावे लागायचे. पण आता भारत आज जगातला दुसरा सर्वात मोठा निर्यातदार देश बनला आहे. मेड इन इंडिया चिप्सने जगातल्या गाड्या चालताना दिसतील आणि माझं पुणे शहर तर ऑटोमोबाईल हब आहे. आता आम्ही भारताला इलेक्ट्रिक वेहिकलचा हब बनताना बघू. भाजपचा संकल्प हा भारताला सेमी कंडक्टर हब, इनोवेशन हबमध्ये बनवण्याचा आहे. भारतात हायड्रोजन हब बनवण्याचता संकल्प आहे. हे आमचं पहिलं असं सरकार आहे ज्याने सर्वसामान्य नागरिकांचा विचार केला आहे”, असा दावा नरेंद्र मोदींनी केला.