राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी अदलाबदल; भाकरी फिरण्याचे शरद पवारांचे संकेत

मुंबई, २७ एप्रिल २०२३ : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी बंडखोरी करण्याचा प्रयत्न केल्याने राजकारणातील वातावरण तापले आहे. मात्र, आता त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा व अध्यक्ष शरद पवार यांनी भाकरी फिरवली नाही तर ती करपते आणि आता पक्षात भाकरी फिरवली जाणार आहे असे वक्तव्य केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी घडणार असल्याचे संकेत आले आहेत. यामध्ये अजित पवारांना जबाबदारी काय मिळते? हे पहावे लागणार आहे.

मुंबई येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित युवा मंथन कार्यक्रमांमध्ये शरद पवार बोलत होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले.
भाकरी फिरवावी लागते ती फिरवली नाही तर ती करपते. त्यामुळे आता भाकरी फिरवायची वेळ आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे. मुंबईत युवक काँग्रेसच्या वतीने युवा मंथन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बदल होणार हे स्पष्ट आहे.

शरद पवार यांनी बुधवारी मुंबईत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी पक्ष संघटनेत काम करणाऱ्या युवकांची वर्गवारी कशी करायची ते ठरवलं पाहिजे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. वरच्या टप्प्यात कोणा-कोणाला आणायचे त्याचा विचार करा. महापालिका निवडणुकीमध्ये संघटनेच्या वतीने निवडणूक लढवण्याची संधी दिली जाईल. त्यामधून एक नवं नेतृत्व तयार केलं जाईल असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. आता विलंब करुन चालणार नाही. भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे, भाकरी फिरवली नाही तर ती करपते असंही वक्तव्य शरद पवार यांनी यावेळी केलं.

माझा राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडे पाहण्याचा दृष्टीकोन असा आहे की यातून दृष्टी असलेल्या कार्यकर्त्यांची फळी आपल्याला महाराष्ट्रात तयार करायची आहे. ही फळी आपण तयार केली तर महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याची ताकद आजच्या तरुणांमध्ये आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. मुंबईत कार्यकर्त्यांची कमतरता नाही. मुंबई ही कार्यकर्त्यांची खाण आहे. मुंबई बदलते आहे, पण इथले सामान्य कुटुंब टिकलं पाहिजे. गिरणी कामगारांची मुंबई आपण पाहिली आहे. तेव्हा कष्टकरी वर्ग हा मोठा वर्ग होता. आज तो कष्टकरी दिसत नाही. या ठिकाणी असलेल्या गिरण्या गेल्या आहेत. तिथे मोठमोठ्या इमारती झाल्या आहेत. गिरणीत काम करणारा कष्टकरी कुठे आहे ते माहित नाही असं म्हणत शरद पवार यांनी खंत व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसचा चेहरा बदलण्यासाठी आमचा युवक पुढे येतो आहे त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप