कोल्हापूरच्या पदाधिकाऱ्यांचे अजित पवारांना उपटले कान

कोल्हापूर, ३० मे २०२३ : महाराष्ट्रातील पुरोगामी शहर म्हणून कोल्हापूरचे नाव घेतले जात असले तरी तेथे भाजपची शक्ती वाढत आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस कमकवुत होत आहे. त्यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्य पदाधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. लोकसभेसाठी इतरांची नावे सांगून स्वतःची जाबाबदारी झटकू नका. संभाजीराजे छत्रपती, धनंजय महाडिक यांच्या बाबतीत सोयीस्कर राजकारण केल्याने आपलल्याला मत कमी मिळाली. महापालिकेतील नगरसेवकांची संख्या घटत आहे. पक्षासाठी कार्यालय मिळत नाही हे निदर्शनास आणून देत कान उपटले
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूरातून आमदार हसन मुश्रीफ, माजी आमदार के. पी. पाटील तर हातकणगले मधून जिल्हा बँकेचे संचालक रणवीरसिंग गायकवाड यांचे नाव मंगळवारी मुंबईत झालेल्या पक्षाच्या उच्चस्तरीय बैठकीत पुढे आले आहे.

आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मतदारसंघ निहाय आढावा मुंबई पक्ष कार्यालयात घेतला. आजच्या बैठकीला ज्येष्ठ नेते शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील, के. पी. पाटील, जिल्हा अध्यक्ष ए. वाय. पाटील, प्रदेश उपाध्यक्ष मानसिंगराव गायकवाड, जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील आसुर्लेकर आदींकडून मतदारसंघ निहाय आढावा घेतला.
हातनंगले मतदारसंघासाठी जिल्हा बँकेचे संचालक रणवीरसिंग गायकवाड यांचे एकमेव पुढे आले. ५ वेळा खासदार झालेले दिवंगत उदयसिंगराव गायकवाड यांचे ते नातू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मानसिंगराव गायकवाड, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती शैलजादेवी गायकवाड यांचे ते सुपुत्र असल्याने त्यांना चांगले पाठबळ मिळू शकते असा चर्चेचा सूर राहिला.

कोल्हापूरसाठी ठाकरे गटात असलेले माजी आमदार संजय घाटगे यांना पक्षात घेवून उमेदवारी द्यावी असे सुचवल्यावर अजित पवार यांनी इतरांची नावे सुचवून आपली जबाबदारी झटकू नका, अशा शब्दात खडसावले. अरुण डोंगळे यांचे नाव पुढे केल्यावर ते किमान पक्षात तरी आहे का; याची तरी खात्री करा, अशा शब्दात समज दिली गेली. यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीतील संभाजीराजे छत्रपती, धनंजय महाडिक यांच्या बाबतीत सोयीस्कर राजकारण केल्याने त्यांना मते कमी पडली होती, याचीही जाणीव नेतृत्वाने करून दिली.

कोल्हापूर महापालिकेत ८१ प्रभाग असताना नगरसेवकांची संख्या घटत आहे. मेळाव्याला मोजकेच कार्यकर्ते उपस्थित राहतात. भाजपने प्रशस्त कार्यालय बांधले पण राष्ट्रवादीच्या कार्यालयासाठी स्वतःची एखादी खोलीही मिळू शकत नाही, असे मुद्दे उपस्थित करत अजित पवार यांनी संघटनात्मक बांधणीवर कोरडे ओढले.