“उद्धव ठाकरे यांनी ‘ही’ एक गोष्ट करावी, शिवसेना पुन्हा एकत्र येईल” – शिंदेगटातील मंत्र्याचा दावा

मुंबई, २ जानेवारी २०२३: एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या भूमिकेशी फारकत घेतली आणि भाजपसोबत सत्ता स्थापन केली. बंडखोरी आणि सत्तास्थापनेच्या मधल्या काळात ठाकरेगट आणि शिंदेगट पुन्हा एकत्र येण्यासाठी प्रयत्न केले गेले किंवा या दोघांनी एकत्र येण्याची शक्यताही राजकीय वर्तुळात व्यक्त केली गेली.पण शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर ही शक्यता मावळली. पण आता हे दोन्ही नेते पुन्हा एकत्र येण्याची शक्यता शिंदेगटातील मंत्र्यानेच व्यक्त केली आहे. त्यासाठी ठाकरेंसमोर एक अट ठेवण्यात आली आहे.

शिंदेगटाचे नेते आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंसमोर एक अट ठेवली आहे. ते शिर्डीत बोलत होते.

आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारे लोक आहोत. बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारी लोकं सहजासहजी सोडून जात नाहीत. त्यामुळे काहीतरी निश्चितपणे असं घडलेलं आहे, ज्यामुळे लोक नाराज झाली आणि बाहेर पडली. ती गोष्ट नेमकी काय घडली याचं आत्मपरिक्षण जसं मी केलं तसं उद्धव ठाकरे यांनीही त्याचं आत्मपरिक्षण करावं. जर त्यांनी आत्मपरिक्षण केलं तर शिवसेना एकसंध व्हायला वेळ लागणार नाही, असं केसरकर म्हणालेत.
उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मला आदर आहे. कटूता कमी करणं उद्धवजींच्या हातात आहे. मी त्यांचा आदर ठेवणारा मनुष्य आहे. उद्धव ठाकरे भेटले तेव्हा मी त्यांना काहीच उत्तर दिलं नव्हतं, असंही केसरकर म्हणाले आहेत.

अजितदादा पवार निर्मळ मनाचं व्यक्तीमत्व आहे. ते बाहेरून कठोर वाटत असले तरी त्यांचं मन निर्मळ आहे. बोलताना फटकळ बोलतीत मात्र विरोधी पक्षनेता कसा असावा तर अजीतदादांसारखा असावा, असं वाटतं. जसा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आम्हाला अभिमान आहे. तसाच विरोधी पक्षनेते म्हणून अजितदादांचा आम्हाला अभिमान आहे, अशा शब्दात दीपक केसरकरांनी अजित पवारांचं कौतुक केलंय.