उदयनराजे यांच्या भावना योग्य ठिकाणी पोहचल्या: देवेंद्र फडणवीस

पुणे, २९ नोव्हेंबर २०२२: छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे आदर्श आहेत, त्यांच्याशिवाय दुसरा प्रेरणास्त्रोत असूच शकत नाही. छत्रपती उदयनराजे यांच्या भावना योग्य ठिकाणी पोहचलेल्या आहेत. आम्ही त्यांच्या पाठिशी आहोत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
पुणे दौर्यावर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खासदार उदयराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवाजी महाराज यांच्या इतिहासचे विकृतीकरण सुरू आहे, तरीही कारवाई होत नसल्याने ते उद्विग्न झाले होते. याबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले, उदयनराजे हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आहेत, ते हतबल होऊच शकत नाहीत. ते भावनीक होऊन बोलले असले तरी आम्ही सर्वजण उदयराजे यांच्या पाठिशी आहोत. त्यांच्या भावना योग्य ठिकाणी पोहचल्या आहेत. राज्यपालांची नियुक्ती सरकार नाही, तर राष्ट्रपती करतात. त्यामुळे सरकार यात काही करू शकत नाही. राज्यपालांच्या संदर्भात अधिकार राष्ट्रपतींना आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापेक्षा मोठा प्रेरणास्त्रोत कोणीच असू शकत नाही, आमचे आणि सर्वांचे तेच आदर्श आहेत.
मंत्रालय जे सत्तेचे सर्वोच्च स्थान आहे. त्या ठिकाणी शिवाजी महाराज, आई जिजाऊ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची तैलचित्रे आहेत. तेथे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचीही तैलचित्रे असली पाहिजेत, अशी कल्पना होती. आमचे सरकार आल्यानंतर त्याला गती दिली. आज या तैलचित्रांचे अनावरण झाले ही अतिशय समाधानाची बाब आहे.

गोखले कुटुंबियांचे केले सांत्वन

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे नुकतेच निधन झाले. पुणे दौर्यावर असलेल्या फडणवीस यांनी गोखले यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी फडणवीस म्हणाले, “विक्रम गोखले हे केवळ एक सिद्धहस्त अभिनेते नव्हते तर उत्तम व्यक्तीदेखील होते. अभियनाच्या क्षेत्रात थियेटर असो की, सिनेमा, हिंदी असो, मराठी असो सगळ्या प्रकारच्या कलाविष्कारामध्ये छाप उमटवली होती. हे करताना सामाजिक भान होते. समाजातल्या अनेक घटकांना ते मदत देखील करायचे. त्यांची मते ठाम असायची. त्यामुळे एक उत्तम व्यक्ती, उत्तम अभिनेते आणि अभिनय क्षेत्रातील एक चालते बोलते विद्यापीठ असे हे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या परिवाराचे सांत्वन करण्यासाठी या ठिकाणी आलो व दर्शन घेतले.”