हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवाच, मुख्यमंत्र्यांनी थेट दिले थेट आव्हान

सातारा, २६ नोव्हेंबर २०२२ : सातत्याने हल्ले सुरु असल्याने आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही शड्डू ठोकले आहे. हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा असे त्यांनी विरोधकांना ललकारले. विरोधकांना थेट सरकार पाडण्याचे आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. विरोधकांनी दोन दिवसांपासून सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर हल्ला चढविला होता. विरोधकांच्या जोर बैठका वाढल्याने त्याविरोधात मुख्यमंत्र्यांनी जोरदार आघाडी उघडली.

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात राजकारणावर ज्योतिषशास्त्राने कुरघोडी केली आहे. त्यातच मुख्यमंत्र्यांनी सहकाऱ्यांसह पुन्हा गुवाहाटीचा दौरा काढल्याने विरोधकांच्या हातात आयते कोलीत मिळाले.

आत्मविश्वास कमी असल्यानेच मुख्यमंत्र्यांनी ज्योतिषाला आणि कर्मकांडाला महत्व देत असल्याचा आरोप विरोधकांनी सुरु केला. हे सरकार मंत्र-तंत्रावर तगल्याचा आरोप होत असताना मुख्यमंत्र्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.

बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात घडलेले मोठं-मोठे शिवसैनिक आज आपल्यासोबत आहेत. गजानन कीर्तिकर, रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ असे ज्येष्ठ नेत्यांनी आपल्यावर विश्वास टाकल्याचे सांगत, त्यांनी ठाकरे गटाला आत्मपरिक्षण करण्याचे, आत्मचिंतन करण्याचा सल्ला ही दिला.

सीमाप्रश्नावरुन वातावरण तापलेले असताना हा प्रश्न धसास लावण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सीमाप्रश्नावर राज्य सरकार स्वस्थ बसणार नसल्याचे संकेत त्यांनी दिले.

राज्यात प्रत्येक कॅबिनेटमध्ये एक दोन जलसिंचन योजना राबविण्यात येत आहेत. महाराष्ट्र जलसिंचनाखाली आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. निर्णय घ्यायाला हिंमत लागते, असा टोलाही त्यांनी लगावला.