तुमचे रडगाणे बंद करा महत्त्वाचे प्रकल्प का रखडवले याचे उत्तर द्या – निर्मला सीतारामन यांची महाविकास आघाडीवर टीका

पुणे, २५ सप्टेंबर २०२२: वेदांत प्रकल्पावरून सध्या गदारोळ होत आहे. मात्र महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात रत्नागिरीतील रिफायनरी प्रकल्प, सागरबाणा, मुंबईतील मेट्रो आणि अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनचे प्रोजेक्‍ट होऊ शकले नाही. केवळ वेदांतपेक्षा चारही प्रकल्प का रखडले, असा सवाल केंद्रीय अर्थमंत्री व भाजपच्या ज्येष्ठ नेत्या निर्मला सीतारामन यांनी केला.

पुणे लोहगाव विमानतळसंदर्भात माहिती घेतली. आतापर्यंत या विमानतळाचे काम 70 टक्‍के पूर्ण झाले असून, 30 टक्‍के काम अजून राहिले आहे. या विमानतळाचे काम 2023 पूर्ण होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. बारामती मतदारसंघात लोकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला आहे. बारामती मतदारसंघ जिंकण्यासाठी नव्हे, तर भाजप पक्ष बळकटीकरसाठी आलो आहे. याचप्रमाणे प्रत्येक मतदारसंघात भाजपचे संघटनाचे काम सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

करोना काळात भारतीय जनताच्या कार्यकर्त्यांनी बारामतीमध्ये मोठे काम केले आहे. याउलट अन्य पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून या काळात काहीच कामे केली नसल्याचे दिसून आले.

सहकार खात्याच्या जोरावर तुम्ही मोठे झालात. परंतु या सहकार मंत्रालय तुम्ही निर्माण करू शकले नाही. मात्र मोदी सरकारने हे काम केले आहे. तसेच केंद्र सरकारच्या काही योजना अद्यापही ग्रामीण भागातील तळापर्यंत पोहोचू शकले नाहीत. त्याची माहिती मागविली असून, त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे त्या म्हणाल्या.