शिंदे फडणवीसांचे सरकार डरपोक – राज ठाकरेंची वर्धापनदिन मेळाव्यातून टीका

नाशिक, ९ मार्च २०२४: प्रार्थना स्थाळावरचे भोंगे काढायला सांगितले होते. भोंगे बंद झाले होते. पण हे डरपोक सरकार निघालं. उद्धव ठाकरेचं सरकार होतं त्यावेळी राज्यातील १७ हजार मनसौनिकांवर गुन्हे दाखल झाले होते. आणि हे स्वत:ला हिंदुत्वावादी समजतात. काय चुकीचं केलं होतं. ह्या भोंग्याचा मुस्लिम समाजालाही त्रास होता. आपल्या आंदोलनानंतर सर्व बंद झालं होतं पण सरकारचं ढीलं पडल्यानंतर पुन्हा सुरु झालं. तुमच्या सगळ्यांच्या कष्टातून हे राज्य माझ्या हातात द्या, हे सगळे भोंगे एकसाथ बंद करतो, असे आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नाशिकच्या मेळाव्यातून केलं.

मनसेने अनेक कामं केली, अनेक यशस्वी आंदोलन केली. माझ्यासकट अनेक महाराष्ट्र सैनिकांनी तुरुंगवास भोगला, मराठी माणसांसाठी लाठ्या काठ्या खाल्ल्या. आपले विरोधक चुकीच्या गोष्टी पसरवतात. राज ठकारे सुरुवात करतो आणि शेवट करत नाहीत. पण एक आंदोलन दाखवा ज्याचा शेवट केला नाही. बाकींना प्रश्न विचारणार नाहीत, असे राज ठाकरे म्हणाले.

आमच्यामुळे मोबाईवर मराठी ऐकू यायला लागलं, टोलनाके बंद झाले. आमची स्वच्छ भूमिका होती टोलमधून किती पैसे येतात आणि कुठं जातात. मुंबई-गोवा रस्ता अजूनही भीषण आहे. मुंबई-नाशिक रस्ता भीषण झाला आहे. रस्ते नीट करता येत नाहीत आणि टोल वसूल करतात, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.

आता आम्ही प्रश्न विचारतो की मगाच्या सरकारने एक विषय पुढं ढकलला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रातील स्मारक का पूर्ण झालं नाही? पंतप्रधान आले फुलं वाहून गेले, काय झालं त्या फुलांचं? अशा कित्येक गोष्टी आहेत त्यांनी शेवट केला नाही, पण मनसे केलेल्या प्रत्येक आंदोलनाचा शेवट झाला, असे राज ठकारेंनी यांनी म्हटले.

आपल्याकडे विचार करणं याला कोणी काम मानतचं नाही. हातापायांची धावपळ जेवढी करु त्यालाच आपण मेहनत मानतो. पण विचार करण्याला मेहनत मानत नाहीत. अनेक गोष्टी रणनीतीच्या असतात, काही गोष्टी सांगता येत नाहीत. त्यावेळी तुमच्यासमोर वेगळं चित्र उभा केलं जातं, असं राज ठाकरेंनी म्हटलं.