‘२०२४ मध्ये मी मुख्यमंत्री असेल की नाही जनता ठरवेल’ – एकनाथ शिंदे यांचे उत्तर

मुंबई, २५ फेब्रुवारी २०२३: महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी ठेवत मुख्यमंत्री केले. त्यामुळे आता २०२४ ला शिंदे यांचे काय होणार अशी चर्चा होत असताना त्याबाबत त्यांना प्रश्‍न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री कोण होणार हे जनतात ठरवेल असे सावध उत्तर त्यांनी दिले.

एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत सत्ता स्थापन करून आठ महिने उलटले आहेत. काळात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हे सरकार अल्पावधीच कोसळेल, असा दावा केला होता. मात्र, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार मजबूत आहे. एकंदरीत राजकीय परिस्थिती असताना आगामी निवडणुकीत शिंदे गट आणि भाजपा युतीकडून मुख्यमंत्री पदाचा प्रमुख चेहरा कोण असणार? याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत. २०२४ मध्येही तुम्हीच मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असणार का? असं विचारलं असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट उत्तर देणं टाळलं आहे. कुणाला मुख्यमंत्री करायचं हे जनतेच्या हातात असतं, आम्ही काम करायचं आहे, आम्ही काम करू असं उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं.
२०२४ मध्ये तुम्हीच मुख्यमंत्री असणार का? असं विचारलं असता एकनाथ शिंदे म्हणाले, “हे पाहा, हे सर्व जनतेच्या हातात असतं. कुणाला मुख्यमंत्री करायचं आणि कुणाला मुख्यमंत्री पदावरून हटवायचं, याचा निर्णय जनताच घेत असते. आम्ही काम करणार आहोत. आम्हाला दिवस रात्र एक करून काम करायचं आहे. आज आम्ही राज्यात मोठमोठे प्रकल्प उभारत आहोत. आम्ही आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, शेती आणि पायाभूत सुविधा अशा सर्वच क्षेत्रात काम करत आहोत. आम्ही प्रत्येक क्षेत्राचा विकास करू इच्छित आहोत.”

“महाराष्ट्र हे देशातील पहिल्या क्रमाकांचं राज्य आहे. महाराष्ट्राचा जीडीपी १५ टक्के आहे. महाराष्ट्राची निर्यात २५ टक्के इतकी आहे. थेट परकीय गुंतवणूक १७ ते २० टक्के आहे. देशाच्या प्रगतीत महाराष्ट्राचं खूप मोठं योगदान आहे. त्यामुळे आम्ही काम करणार आहोत,” असं उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.