आम्हाला सोबत घेतल्याशिवाय मोदींना सत्ता मिळणार नाही – रामदास आठवले यांचे वक्तव्य

देहूरोड, ३१ मे २०२३ : काँग्रेस राष्ट्रवादी कडून सन्मान न मिळाल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी भाजपसोबत हात मिळवणे केली. भाजप सोबत आहेत. त्यांना केंद्रामध्ये सन्मानाचे मंत्रीपद देखील देण्यात आलेली आहे. असे असताना आता रामदास आठवले यांनी आम्हाला सोबत घेतल्याशिवाय भाजपला एखादी सत्ता मिळणार नाही असे वक्तव्य केले आहे.

रिपब्लिकन पक्षाला सोबत घेतल्याशिवाय देशात आणि राज्यात भाजप आणि एनडीएला पर्याय नाही. रिपाइंशिवाय एकहाती सत्ता मिळवणे त्यांना सोपं नाही, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री आणि रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केलं आहे. मावळातील देहूरोड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जाहीर भाषणात बोलत होते.

सत्ता मिळवल्याशिवाय गोरगरिबांची, लोकांची कामं करता येणार नाहीत,म्हणून सत्तेत राहणे गरजेचं आहे. त्यामुळे आपण एकटे लढलो तर सत्ता मिळणे हे देखील अवघड असल्याचे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये मला मंत्रीपद मिळाले म्हणून काहींना वाईट वाटत आहे. ज्यांना वाईट वाटतंय त्यांना वाईट वाटू दे. आपण आपलं काम करत राहू, असंही आठवले यांनी म्हटले आहे.

बाबासाहेबांचा निळा झेंडा माझ्या हातात आहे. मी कुठेही गेलो तरी निळा झेंडा घेऊन जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील निळा झेंडा मान्य आहे. रिपब्लिकन पक्षाला सोबत घेतल्याशिवाय देशात आणि राज्यात सत्ता मिळणे कठीण आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्ष वेळोवेळी आपलं अस्तित्व टिकवून आहे, असं रामदास आठवले यांनी म्हटलं.