घटनाबाह्य सरकारवर उद्योजकांचा विश्वास नाही – आदित्य ठाकरे

पुणे, २९ ऑक्टोबर २०२२: राज्यात शिंदे फडणवीस यांचे घटनाबाह्य सरकारवर आले आहे. या सरकारवर उद्योजकांचा विश्वास नाही. राज्यला हे सरकार अस्थिर करत आहे, म्हणूनच मोठे उद्योग राज्याबाहेर जात आहेत, अशी सणसणीत टीका शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली.

शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रकल्प महाराष्ट्र बाहेर गेल्यानंतर पत्रकार परिषद घेत उद्योग मंत्री आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली.
आदित्य ठाकरे म्हणाले, मी, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार सचिन अहिर आम्ही सर्वांनी नाशिक पुणे दौरा केला. शेतकऱ्यांची भेट घेतली, शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आम्ही अधिवेशनात पायऱ्यांवर आंदोलन करून ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी केली. मात्र सरकारने ऐकलं नाही. अजूनही शेतात पाणी आहे. कुठलाही मंत्री शेतात गेलेला नाही आहे. आताच्या घडीला शेतकऱ्यांसोबत उभं राहायला हवं, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

एका बाजूला शेतकरी संकटात असताना उद्योग जगतात देखील आपल्याला धक्के बसत आहेत. वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, मेडिकल इक्विपमेंट पार्क सारखे मोठे प्रकल्प बाहेर गेले असताना आता टाटा एअरबस सारखा मोठा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला. उद्योगमंत्री यांनी एक मुलाखतीत सांगितलं होतं की मिहानसोबत एअरबस प्रकल्प नागपूरला येणार. चुकीची माहिती का दिली? चार मोठे प्रकल्प बाहेर गेलेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उद्योग मंत्री यांचा राजीनामा घेणार का?, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.

कुठल्याही उद्योजकांना या घटनाबाह्य सरकरवर विश्वास नाही, हे सरकार किती काळ टिकेल. दिल्लीत या सरकारच्या अस्थिरतेबाबत चर्चा सुरू आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले. एका माणसाच्या राक्षशी महत्वकांक्षामुळे गद्दारी मुळे महाराष्ट्राच नुकसान होते महाराष्ट्राला फटका बसतोय, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

इतर राज्याचे मुख्यमंत्री आपल्या राज्यात येऊन उद्योग आपल्या राज्यात कसे येतील याबाबत प्रयत्न केले. आपले मुख्यमंत्री मंडळं फिरताहेत. कोणी गद्दारी करत असेल तर त्याला शाल घालताहेत. मी जर यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असतो तर राजीनामा दिला असता आणि सरकारमधून बाहेर पडलो असतो आणि निवडणुकीला सामोरे गेलो असतो, असं आदित्य ठाकरे म्हणाले.