मुंबईतील इंडियाच्या बैठकीसाठी आघाडीचे मंथन

मुंबई, २८ जुलै २०२३ : देशातल्या विरोधी पक्षांची इंडिया या आघाडीचे बैठक पटना बेंगलोर येथे झाल्यानंतर आता पुढची बैठक मुंबई येथे होणार आहे याच्या नियोजना संदर्भात आज आघाडीच्या नेत्यांमध्ये मंथन करण्यात आले.

महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनी आज मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत काय चर्चा होणार? लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरणार का? विधानसभेचा विरोधी पक्षनेता कोण होणार? अशा विविध विषयांवर या बैठकीत चर्चा होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. दरम्यान, या बैठकीनंतर काँग्रेस नेते पत्रकार परिषदेला सामोरे गेले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींच्या प्रश्नांची उत्तरं दिली.

या बैठकीत काय चर्चा झाली? याबद्दल सांगताना नाना पटोले म्हणाले, १५ ऑगस्टनंतर किंवा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ची (INDIA) मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीच्या पूर्वतयारीसाठी आम्ही आज (२८ जुलै) शरद पवार यांना भेटलो. महाविकास आघाडी या बैठकीचं आयोजन करेल. आजच्या बैठकीत शरद पवार यांनी विरोधी पक्षांच्या बंगळुरू आणि पाटण्यातल्या बैठकांमधला अनुभव सांगितला. मुंबईत होणाऱ्या बैठकीत अजून काय चांगलं करता येईल, याबाबत शरद पवार यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. तसेच यावेळी शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून बातचित केली.
नाना पटोले म्हणाले, पुढच्या शनिवारी सकाळी ११ वाजता ‘इंडिया’च्या बैठकीच्या पूर्वतयारीसाठी आम्ही पुन्हा एक बैठक घेणार आहोत. सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीला अनेक राज्यांचे मुख्यमंत्री येतील, वेगवेगळ्या राज्यांमधील पक्षांचे नेते येतील. या बैठकीसाठी १०० पेक्षा जास्त मोठमोठे नेते मुंबईत येतील. असा अंदाज आहे.