एकनाथ शिंदे यांचीही अखेरची पूजा पुढची पूजा अजित पवार करणार – अमोल मिटकरी यांचे वक्तव्य

मुंबई, २३ जून २०२३ :पुढच्या वर्षी अजित पवार मुख्यमंत्री म्हणून पंढरीच्या पांडूरंगाची महापूजा करतील. यंदाची महापूजा ही एकनाथ शिंदे यांच्या राजकारणातील अखेरची महापूजा ठरेल, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केले आहे.
मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाचे वारे वाहू लागले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अलीकडेच खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती पक्षाच्या कार्याध्यक्षपदी केली आहे. सुप्रिया सुळेंच्या या नियुक्तीमुळे अजित पवार नाराज झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. यानंतर आता स्वत: अजित पवारांनी पक्षाची जबाबदारी मिळावी, अशी इच्छा व्यक्त केली. अजित पवारांच्या या विधानानंतर राजकीय नेत्यांकडून विविध तर्क वितर्क लावले जात आहेत.

अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घुसमट होत आहे. अजित पवार काही दिवसांत उठाव करतील, असं विधान शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलं. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुढच्या वर्षी अजित पवार मुख्यमंत्री म्हणून पंढरीच्या पांडूरंगाची महापूजा करतील. यंदाची महापूजा ही एकनाथ शिंदे यांच्या राजकारणातील अखेरची महापूजा ठरेल, असं विधान मिटकरी यांनी केलं. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना मिटकरींनी ही प्रतिक्रिया दिली. मिटकरींच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लावले जात आहेत.
यावेळी अमोल मिटकरी म्हणाले, “आगामी निवडणुकीनंतर अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊन पुढच्या आषाढी एकादशीची महापूजा करतील. अजित पवारांना महापूजेचा मान मिळो. कारण आळंदीच्या पालखीतील वारकऱ्यांवर झालेला हल्ला, हे वारकरी कधीही विसरू शकणार नाहीत. यावर्षी आषाढी एकादशीच्या दिवशी एकनाथ शिंदे हे पंढरीच्या पांडूरंगाची महापूजा करतील. ही महापूजा एकनाथ शिंदेंच्या राजकारणातील अखेरची महापूजा ठरेल. पुढील महापूजा अजित पवारांच्या हस्ते होणार, ती महापूजा अजित पवारांच्या हस्ते होवो, हेच साकडं तुकोबारायांच्या चरणी घातलं आहे.”

“अजित पवार काही दिवसांत उठाव करतील”

संजय शिरसाट म्हणाले की, अजित पवारांना पक्षाचा प्रमुख करणं हे काही राष्ट्रवादीतील नेत्यांना परवडणारं नाही. म्हणून त्यांना डावललं जात आहे. गेल्यावेळी अजित पवारांना मुख्यमंत्रीपद मिळणार होतं. पण स्वतःहून काँग्रेसच्या गळ्यात टाकलं. अजित पवार मुख्यमंत्री झाले असते तर काय झालं असतं? उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं असतं तर काय झालं असतं? कोणतं आभाळ कोसळणार होतं? पण नाही, त्यांची (एकनाथ शिंदे) इमेज वाढली तर आपल्याला धक्का बसेल ही जी ठाकरेंची भूमिका होती तीच भूमिका अजितदादांबद्दल राष्ट्रवादीत आहे. त्यामुळे अजितदादा एक दिवस उठाव करतील असं माझं मत आहे.