uddhav Thackeray

अजित पवारांनी शरद शरद पवारांबद्दल आदर ठेवायला हवा – उद्धव ठाकरे यांची टीका

मुंबई, २७ जुलै २०२३: राष्ट्रवादीतील फुटीनंतर झालेल्या पहिल्याच मेळाव्यात अजित पवार यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. त्यांच्या याच वक्तव्यावर टीका करत उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. ज्यांच्याकडून आपण सर्व काही घेतो त्यांच्याबद्दल आपण आदर ठेवायलाच हवा असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडाचे निशाण फडकवत पक्षातील काही आमदारांना सोबत घेत अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. या घडामोडीनंतर अजित पवार गटाने मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात शरद पवारांनी आता रिटायर्ड व्हायला पाहिजे. त्यांचे वय झाले आहे, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली.

खासदार संजय राऊत यांनी शिवसेना पॉडकास्टच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रद्रर्शित करण्यात आला. या मुलाखतीत ठाकरेंनी अजित पवार यांच्यावर टीका केली.
ते म्हणाले, हे अत्यंत वाईट असे मत होते. ज्यांच्याकडून आपण सर्वकाही घेतो त्यांच्याबद्दल असे उद्गार काढणे हे आपल्या संस्कृतीला शोभणारे नाही. आपण नेहमी वडिलधाऱ्यांचा मान, आदर, सन्मान ठेवतो. तो ठेवला गेलाच पाहिजे. वय झालं म्हणजे काय, मग आशिर्वाद कोणाकडून घ्यायचे. हे त्यांचं (अजित पवार) वक्तव्य मला आवडलं नाही. तुमचं पटत नसेल तर जाहीरपणे सांगा की तुमचं पटत नाही.

फक्त अजित पवारच नाही तर ज्याला कोणाला त्याच्या स्वार्थासाठी जायचे असेल तर स्वार्थासाठी जातोय असं खरं बोलून जावं, कदाचित लोक स्वीकारतील. पण चार-चार, पाच-पाच वेळा सगळं मिळाल्यानंतर, सगळं जे चांगल्यात चांगलं देता येणं शक्य होतं ते दिल्यानंतर सुद्धा अन्याय झाला हो.. म्हणून टाहो फोडून जाणं बरोबर नाही. मग त्यात आमच्यातले सुद्धा गद्दार असतील आणि सगळ्याच पक्षातले गद्दार असतील,अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी टीका केली.