आता आम्ही राज ठाकरे यांचा भोंगा उतरवू – सुजात आंबेडकरांची टीका

वाशिम, १९ ऑक्टोबर २०२४ राज ठाकरे यंदाच्या विधानसभेला त्यांचा दमखम दाखवणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना यंदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहे. मुंबई बाहेर मराठवाडा आणि विशेषतः विदर्भात सीमोल्लंघन करण्याचा राज ठाकरे यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. या भागात ते तळ ठोकून होते. आता वंचित बहुजन आघाडीने त्यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. राज ठाकरेंचा भोंगा उतरवण्याचे काम या निवडणुकीत करण्याचा दावा वंचितने केला आहे. त्यामुळे इतर पक्षांच्या धुमधडाक्यात वंचित आणि मनसे यांच्यात वाद शिलगण्याची शक्यता आहे. वंचितने लोकसभेत काही ठिकाणी चांगली कामगिरी दाखवली. त्यांना जागा खेचून आणता आली नाही. तर गेल्यावेळी त्यांनी भल्याभल्यांना विधानसभेत घाम फोडला होता.

राज ठाकरेंचा भोंगा उतरवण्याचे काम वंचित बहुजन आघाडी करेल, असे सुजात आंबेडकर म्हणाले. मुस्लिमांसाठी फक्त वंचित बहुजन आघाडी लढते ते म्हणतात ते म्हणतात आम्ही मोठं मोठे स्पीकर लावू भोंगे लावून त्यावर हनुमान चालिसा वाजवू. मात्र त्याला विरोध करून राज ठाकरेंचा भोंगा उतरवण्याचं काम सर्वात आधी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते करतील असं वक्तव्य सुजात आंबेडकर यांनी वाशिममध्ये एका सभेत बोलताना केलं. ते वंचितच्या उमेदवार मेघा डोंगरे यांच्या प्रचारासाठी आले होते.

जोपर्यंत मुस्लिमांचे चार-पाच लोक निवडून जात नाहीत तो पर्यंत त्यांचं भलं होणार नाही, काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेनेचे प्रस्थापित नेते आमचा विकास करू शकणार नाहीत. आमची फक्त एकच मागणी असली पाहिजे की १५ टक्के मुस्लिम समाज महाराष्ट्रात आहे आणि जो पक्ष १५ टक्के त्यांना भागीदारी देईल, १५ टक्के उमेदवारी देईल त्यांनाच मतदान करून आपल्याला विजयी करायचा आहे, असही वक्तव्य सुजाता आंबेडकर यांनी केलं. वंचित बहुजन आघाडीने अनेक ठिकाणी त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. तर उर्वरीत ठिकाणी लवकरच उमेदवार जाहीर करणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.