कोण सुपारीबाज ते घरातील वरिष्ठांना विचारा: मनसेच्या प्रकाश महाजन यांचे रोहित पवारांना उत्तर

छत्रपती संभाजीनगर, ६ ऑगस्ट २०२४: आगामी विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली आहे. या दौऱ्यावर राज्यातील अन्य पक्षांच्या नेत्यांचे बारकाईने लक्ष असल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या दौऱ्यावर खोचक टीका केली होती. सरकारकडून लाडकी सुपारी योजना सुरू केली पण सुपारीबाजांचा करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय महाराष्ट्रातील जनता शांत बसणार नाही, अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली. रोहित पवार यांच्या या टीकेवर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी जशास तसे उत्तर दिले. रोहित पवार यांनी आरोप केला असेल मात्र महाराष्ट्रात कोण सुपारीबाज आहे? हे आपल्या घरातील वरिष्ठ माणसांना विचारा असे प्रत्युत्तर प्रकाश महाजन यांनी दिले.

काय म्हणाले रोहित पवार?
महाराष्ट्रातून गुजरातला गेलेले उद्योग, केंद्र सरकारची गुजरातवर असलेली मेहेरबानी, केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला मिळालेला भोपळा, महाराष्ट्राचे आर्थिक, सामाजिक खच्चीकरण करण्याचे होत असलेले प्रयत्न आणि त्यात लाडक्या खुर्चीच्या प्रेमापोटी गप्प बसलेले सरकार यामुळे महाराष्ट्रात प्रचंड रोष आहे. या रोषाचा फटका बसू नये म्हणून मतांचे विभाजन करण्यासाठी लोकप्रिय खेळाडू मैदानात उतरवून २८८ जागा लढण्याचे आदेश सत्ताधाऱ्यांना दिल असल्याचे कळते.

महाराष्ट्रात निवडणुका जवळ येत असल्याने दलालीतून गलेलठ्ठ झालेल्या सरकारने लाडकी सुपारी योजना सुरू केली असली तरी महाराष्ट्र प्रिय असलेले खेळाडू सत्ताधाऱ्यांच्या अडकित्त्यात अडकणार नाहीत ही अपेक्षा. लाडकी सुपारी योजनेच्या सर्व छोटा मोठ्या सुपारीबाज लाभार्थ्यांसकट या दलाली सरकारचा करेक्ट कार्यक्रम वाजवल्याशिवाय महाराष्ट्र शांत बसणार नाही, असे ट्विट रोहित पवार यांनी केले.

त्यास प्रकाश महाजन यांनी उत्तर दिले. महाराष्ट्रात कोण सुपारीबाज आहे हे आपल्याच घरातील वरिष्ठ माणसांना विचारा. रोहित पवार यांचा असा कोणता व्यवसाय आहे ज्यामधून त्यांनी कन्नड सहकारी साखर कारखाना घेतला हे रोहित पवारांनी मला सांगावं. सुप्रिया सुळे यांनी देखील मला सांगावं की यांच्या शेतात ११० कोटी रुपयांची वांगी कशी आली? मी अनेकदा बारामतीला जातो आणि मित्रांना विचारतो की या ११० कोटी रुपयांच्या वांग्याचं भरीत खायला मिळेल का, पण मला अजूनही या वांग्याचं भरीत खायला मिळालं नाही अशी खोचक टीका मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केली.