एवढ्या मोठ्या प्रमाणात आरक्षणाची गरज नाही: राज ठाकरेंनी जरांगेना उचकविले

सोलापूर, ५ ऑगस्ट २०२४: महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यापासूनच मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाचं आंदोलन उग्र केलं. परंतु, त्यांच्या आंदोलनाला अद्यापही पूर्णपणे यश लाभलेलं नाही असे असताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आजपासून मराठवाडा दौरा सुरु करताना महत्वाचे वक्तव्य करत जरांगे पाटील यांचा उचकविण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रात सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणात आहेत की आरक्षणाची गरजच नाहीय. पैशांचं व्यवस्थित नियोजन केलं पाहिजे, असे ठाकरे यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता जरांगे पाटील यावर काय भूमिका घेतात हे पाहिले पाहिजे.

राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणात आहेत की आरक्षणाची गरजच नाहीय. पैशांचं व्यवस्थित नियोजन केलं पाहिजे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर या भागात ज्या प्रकारचे फ्लायओव्हर्स होत आहेत हे का होत आहेत? मुळच्या लोकसंख्येसाठी नाही होत. बाहेरून येणाऱ्यांसाठी होत आहेत. आपल्या ठाणे जिल्ह्यात देशामधला असा एकमेव जिल्हा आहे ज्यात सात ते आठ महानगरपालिका आहेत. ग्रामपंचायत, नगरपरिषद, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि मग महानगरपालिका हे स्तर लोकसंख्येनुसार वाढत जातात. एका जिल्ह्यात सात ते आठ महानगर पालिका असतील तर ही लोकसंख्या ठाण्यातील लोकांनी वाढवली का? बाहेरून येणाऱ्या लोकांचा लोंढा मोठ्या प्रमाणात आहे, मग त्या शहरांत आल्यानंतर त्यांची व्यवस्था लावण्यासाठी सरकारचा पैसा खर्च होतो”, असं राज ठाकरे म्हणाले.

पुढे बोलताना राज ठाकरे यांनी आरक्षणासह राज्यातील जातीपातीच्या राजकारणावरही भाष्य केलं. महाराष्ट्रातील मुलांना शिक्षण आणि नोकरी मिळाली पाहिजे, यात जात येते कुठे? महाराष्ट्रात सर्वाधिक नोकऱ्या निर्माण होतात. खासगी शिक्षण संस्था आणि नोकऱ्यात आरक्षण नाही. मग किती जागांवर आरक्षण आहे? हे बघणंही गरजेचं आहे. मुळात सध्या माथी भडकवून राजकारण करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून सुरू आहे. हे फक्त मतांचं राजकारण आहे. प्रत्येकाने ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. यातून हाताला काहीही लागणार नाही.

जातीपातीचं राजकारण करणाऱ्यांना जनतेने दूर ठेवावं
बाहेरच्या राज्यातील तरुण-तरुणी आपल्या राज्यात येतात आणि इथे शिक्षण-नोकऱ्या मिळवतात. या नोकऱ्या महाराष्ट्रातल्या मुलांना मिळत नाही, याचा विचार आपण कधीतरी केला पाहिजे. आज जातीपातीचं प्रकरण शाळा महाविद्यालयांपर्यंत पोहोचलं आहे. यापूर्वी अशी परिस्थिती राज्यात कधीही नव्हती. उत्तर प्रदेशात अशा गोष्टी होतात, असं ऐकलं होतं. आता हे लोन महाराष्ट्रात पोहोचलं आहे, महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण करणाऱ्यांना जनतेने या निवडणुकीत दूर ठेवलं पाहिजे, अशी प्रतिक्रियाही राज ठाकरे यांनी दिली.

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप