अडीच वर्ष उद्धव ठाकरे कुठे होते? महाजन यांच्या प्रश्‍नामुळे सत्ताधारी विरोधकांमध्ये जुंपली

मुंबई, ९ जुलै २०२४ ः विधानसभेत महसूल खात्यावर चर्चा सुरु असताना या खात्याचे मंत्री, तसेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित नसल्याने वरोधकांनी आक्षेप घेत कामकाज थांबवा अशी मागणी केली. त्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी अडीच वर्ष तुमचे सरकार होते, तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुठे होते? ते कामकाजात किती सहभागी झाले असा प्रश्‍न केल्याने विधानसभेत गोंधळ उडाला. महाजन यांच्या वक्तव्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली.

असा झाला विधानसभेत वाद
जयंत पाटील- सभागृहाचं कामकाज स्थगित करा, तसंच संबंधित खात्याच्या मंत्र्याला सभागृहात बोलवा..
विजय वडेट्टीवार- ग्राम विकास मंत्री खोटे बोलले. महिला बालकल्याण मंत्री कुठे गेलेत. कामकाज असून मंत्री नसतील तर कसे चालायचे?, मंत्र्यांना दम द्या…मी मध्ये बोलत असताना हे कसे काय खाली बसून बोलतात.
गिरीश महाजन- विरोधी पक्षनेते काय चालल आहे?
बाळासाहेब थोरात- ही काय पद्धत आहे का सभागृह चालवायची?
विजय वडेट्टीवार- अध्यक्ष महोदय मी काय या मंत्र्यांचं ऐकून बोलू…कोण लागून गेले हे मंत्री. मी यांचं ऐकायचं…तुम्ही आम्हाला शिकवू नका…मंत्री कुठे आहेत लाज वाटत नाही.
अजित पवार- विरोधी पक्षनेते जे बोलतात ते ऐकून मला वाटत त्यांना बोलायचं नसेल.. असं नाही चालणार.
जयंत पाटील- उपमुख्यमंत्री म्हणतात की, मी मागण्या टाकतो…हा उद्दाम पणा योग्य नाही…एकच मंत्री उपस्थित आहेत.
अजित पवार- आम्ही विरोधीपक्ष नेत्याना विनंती केली, काही मंत्री नाहीत ते वरच्या सभागृहात उत्तर देतात…मी म्हणालो मी मुद्दे काढून घेतो…इतर मंत्री देखील उपस्थित आहेत…आम्हाला देखील कळतय..आमची विनंती आहे कामकाज सुरू करावे.
विजय वडेट्टीवार- मला अपेक्षा आहे पुढच्या तीन मिनिटात मंत्री येतील.

हा असा संवाद सुरु सुरु असताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महसूल विभागाच्या प्रश्नांवरील चर्चा थांबवण्याची मागणी केली. विषयाशी संबंधित मंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सभागृहात उपस्थित नसल्याने कामकाज थांबवण्याची मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली. यानंतर ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी देखील सभागृहाचं कामकाज बेकायदेशीर पद्धतीने चालतंय, असा आरोप केला. विरोधकांच्या या आरोपावर मंत्री गिरीश महाजन यांनी थेट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं नाव घेत प्रत्युत्तर दिलं. अडीच वर्षांच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून कधी चर्चेला होते?, असा सवाल गिरीश महाजन यांनी उपस्थित केला. यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळाले.

वडेट्टीवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात झडाणी नावाचे गाव आहे तिथे ६४० एकर जमीन खरेदी केली गेली. गुजरातच्या जिएसटी प्रमुख आहे. त्यांनी जमीन विकत घेतली. सर्व नियम पायदळी तुडवले.करोडो रुपयांचा महसूल बुडवला. एवढी मस्ती आणि दादागिरी. पर्यावरणीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहेत. आम्ही जेव्हा पत्र पाठवलं तेव्हा महुसल विभागाने थातुर-मातुर उत्तर दिलं. कुठलीही परवानगी दिली नाही. गुजरात जिएसटीचा आधिकारी आहे त्याच्यावर काय कारवाई होणार आहे..खेड आणि मावळच्या दोन प्रतांचे अधिकार काढले गेले असंही वडेट्टीवार यावेळी म्हणाले.