आगामी विधानसभेत १५२ जागा भाजप जिंकणार – चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा
ठाणे, १३ जुलै २०२३: महाराष्ट्रात भाजपाची घोडदौड प्रचंड ताकदीने सुरु राहणार आहे. पार्लियामेंट ते पंचायतपर्यंत आम्ही काम करीत असून येणाऱ्या सर्व निवडणुकीत भाजपा क्रमाक एक वर राहील. महाराष्ट्राच्या इतिहासात आतापर्यंत जो आम्ही नंबर गाठला नाही तो भाजप १५२ तर महायुती २०० पेक्षा जास्त जागा जिंकेल असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमधील अंजूर येथे “महाविजय २०२४ – कार्यशाळा” उद्घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, आम्ही महाराष्ट्राचे गणित आखले आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार सोबत आले आहेत आम्ही सर्व जण मिळूण आमचे टार्गेट पूर्ण करणार आहोत. एकूण २८८ विधानसभापैकी महायुतीमध्ये आम्हाला ज्या जागा मिळतील त्यापैकी ८० टक्के जागांवर आमचा विजय होईल म्हणजे १५२ जागांवर आम्ही विजयी होऊ. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुती २०० हून अधिक जागांवर विजयी होईल. जागावाटपावरून एनडीएमध्ये वाद होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून एनडीएच्या ४५हून अधिक तर देशात ३५० हून अधिका जागांवर विजयी होईल.
प्रत्येक बुथवर १०० मतांचे राजकारण करणार आहोत. सर्व समाजाला सांस्कृतिक, राजकीय, सांस्कृतिक व सर्व विषयांचे समाधान करू. १८ पगड जाती व १२ बलुतेदारांना सोबत घेणार आहोत. एका विधानसभेत ६० हजार तर लोकसभेत साडे तीन लाख घरी आम्ही पोहचणार आहोत. सत्ता आणि संघटनेच्या समन्वयातून संकल्प पूर्ण करू.’
समन्वय समिती स्थापन
भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रत्येकी ४ प्रतिनिधी अशी एकूण १२ सदस्यांची समन्वय समिती स्थापन झाली आहे. प्रसाद लाड या समितीचे प्रमुख समन्वयक असतील. निवडणुकीसाठी २८८ वॉर रूम तयार केल्या जाणार, कामाचे ऑडिट होणार, प्रत्येक बुथवर ५० पक्ष प्रवेश व्हावे यासाठी योजना आखली आहे. तर ४८ लोकसभा जागांवर ४८ विस्तारक काम करणार आहेत. भाजपाच्या सर्व आघाड्या अॅक्टिव्ह होत आहेत. मोदीजींच्या सरकारने ९ वर्षांत केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडण्यासाठी घरचलो अभियान राबविण्यात येत असल्याचे श्री बावनकुळे म्हणाले.
नाना पटोलेच्या मनात भिती
कॉंग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणात अस्वस्था निर्माण झाली आहे. सत्ता गेली आहे व पुढे सत्ता येणार नाही. यामुळे नाना पटोले आपल्या संघटनेला व आमदारांना धौर्य देण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागणार असल्याचे वक्तव्य करीत आहेत. कॉंग्रेसचे आमदार भाजपात येतील अशी भितीही त्यांना वाटत असल्याचा टोला बावनकुळे यांनी लगावला.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप