मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट ‘चौकशी’ लावली असती तर मेट्रो झाली नसती

ठाणे, ५ ऑक्टोबर २०२४ : मेट्रो प्रकल्पासह इतर प्रकल्पांची कामे महाविकास आघाडीने बाळ हट्टामुळे बंद पडली होती आणि त्यांनी चौकशीची मागणी केली होती. पण मी चौकशी लावली नाही. जर मी चौकशी लावली असती तर आज मेट्रो प्रकल्प सुरू झाला नसता, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील कार्यक्रमात बोलताना केला. मोदी हे विकास आणि विश्वासाचे रूप असल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकल्पांचे भूमिपूजन झाले की तो प्रकल्प पूर्णत्वास येतो, याची गॅरंटी मिळते. तसेच प्रकल्पाचे भूमिपूजन करणे आणि त्याचे लोकार्पण करणे, असा योग पंतप्रधान मोदी यांना लाभलेला आहे. असे भाग्य कमी लोकांना मिळते, असेही शिंदे म्हणाले. देशाच्या स्वातंत्र्यानंतर मुंबईत सर्वात मोठा विकास होत आहे, तसेच ठाणे हे विकासाचे खणखणीत नाणे असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

महाविकास आघाडीचा अडीच वर्षांचा आणि आमच्या सव्वादोन वर्षांचा हिशोब मांडा, दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल असे त्यांनी म्हटले. आज मुंबई, ठाणे नाहीतर अख्खा महाराष्ट्र कात टाकत आहे. महायुतीचे सरकार सत्तेत आल्यावर लोकांच्या हिताची कामे केली. ही कामे करताना पंचोलीटी, रिलायबिलिटी आणि स्टॅबिलिटी तीन गोष्टींची काळजी घेतली. त्यामुळे आमचे सरकार आता लाडके सरकार झाले आहे. तसेच महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रात नंबर एकवर आहे. याचा अभिमान असल्याचेही त्यांनी सांगितले. करोना रुग्णांची खिचडी खाणारे आम्ही नाही. तर आम्ही जनतेचे अश्रू पुसणारे आहोत. विरोधक आरोप आणि शिव्या शाप देत आहेत पण त्यांना आम्ही आरोपातून नाहीतर कामातून उत्तर देऊ असेही त्यांनी सांगितले. तसेच मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला आहे. त्याबद्दल मोदी यांचे आभार मानतो, असेही ते म्हणाले. मोदी हे विकास पर्व आणि विश्वनेता आहेत. ते भारताला विश्वगुरू करण्याचे स्वप्न ते पाहत आहेत. त्यासाठी ते गती आणि प्रगती याविषयी नेहमी बोलत असतात. तसेच ‘मोदीजी आपके नेतृत्व मे शिखर पर है राज्य, देश का गौरव बढाने के लिए सदा खडा रहेगा महाराष्ट्र’, असेही उद्गार शिंदे यांनी यावेळी काढले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तिसरी इनिंगची दमदार सुरुवात झाली आहे. मोदी सरकारला १०० दिवस झाले असून त्यांनी विकासाचे शतक पूर्ण केले आहे. त्यामध्ये आम्ही एक घटक आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे. मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा अभिमानास्पद निर्णय घेतला असून त्यांचे जनतेच्यावतीने आभार मानतो. मोदी यांनी विकासाची पायाभरणी केल्याने देश मजबूत झाला आहे. मोदी यांच्या विकासकामांमुळे जगात पुढील दहा वर्षे हे भारताचे असणार आहेत. मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्याची दमदार वाटचाल सुरू आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.