मी राज्यातील १३ कोटी जनतेची माफी मागतो, अजित पवारांनी भर सभेत मागितली माफी

लातूर, २८ ऑगस्ट २०२४: छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ असलेल्या राजकोट येथे उभारण्यात आलेला पुतळा कोसळला. या घटनेनंतर फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी विरोधकांनी राज्य सरकारवर प्रचंड टीका केली आहे. तर दुसरीकडे महायुती सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पहिल्यांदाच या घटनेवर भाष्य करत राज्यातील जनतेची माफी मागितली. महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेची मी माफी मागतो. छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला देवासारखेच आहेत. त्यांचा पुतळा वर्षभराच्या आत कोसळणं धक्कादायक आहे, असे अजित पवार म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने राज्यात ठिकठिकाणी जनसन्मान यात्रा काढली जात आहे. ही यात्रा आज लातूर शहरात होती. येथे आयोजित करण्यात आलेल्या एका सभेत अजित पवार बोलत होते. या घटनेत कठोर कारवाई केली जाईल. अधिकारी असोत किंवा कंत्राटदार दोषींविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाही अजित पवार यांनी यावेळी दिली.

मागील वर्षातील डिसेंबर महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित होते. यानंतर हा पुतळा फक्त आठ महिन्यांत कोसळला. या घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. विरोधक तर सरकारवर अक्षरशः तुटून पडले आहेत. यानंतर सरकारी पातळीवर कार्यवाही झाली. दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आज राजकोट किल्ला परिसरात मोठा राडा झाला. येथे ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि माजी मंत्री नारायण राणेंचे कार्यकर्ते भिडले. त्यामुळे दगडफेक आणि धक्काबुक्कीच्या घटना घडल्या. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा रस्ता मालवणमध्येच अडवण्यात आला. यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील महायुती सरकारवर घणाघाती टीका केली. येत्या रविवारी महाविकास आघाडी मुंबईत मोठा मोर्चा काढणार आहे, अशी घोषणाही उद्धव ठाकरे यांनी केली.