बदलापूरच्या आंदोलनाला राजकीय फूस एकनाथ शिंदे यांची टीका

मुंबई, २१ आॅगस्ट २०२४: बदलापूर येथील घटना दुर्दैवी आहे. हा खटला फास्ट्रॅकवर चालवला जाणार आहेत. तसंच, आरोपींना कठोर शिक्षा करण्यासाठी सर्व ते प्रयत्न करण्यात येणार आहेत अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. यामध्ये रेल्वे सेवा बंद पाडल्यामुळे महिलांसह मुली, मुलं आणि वृद्धांनाही त्रास झाला असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

बदलापूर येथे जे आंदोलन झालं ते स्थानिकांनी केलं नाही तर इतर ठिकाणावरून गाड्या भरून लोक आले. या आंदोलनाला राजकीय फूस होती असा थेट आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तसंच, या आंदोलनात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नको, न्याय द्या असा पोस्टर पाहायला मिळाला. हे असं करणाऱ्या लोकांना लाज वाटायला पाहिजे असा घणाघातही मुख्यमंत्र्यांनी यावेली केला आहे.

हजारोंच्या संख्येत बदलापूरमधील नागरिक आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले होते. बदलापूर रेल्वे स्थानाकात रेल्वे रुळांवर उतरून नागरिकांनी रेल्वेमार्ग रोखून धरला होता. अनेक तास रेल्वे रोखल्यानं सीएसएमटी आणि कर्जत अशा दोन्ही दिशांना जाणाऱ्या रेल्वे ठप्प झाल्या होत्या. दरम्यान, पश्चिम बंगालमधील कोलकात्यात महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणानं देशभरात संतापाची लाट असतानाच, महाराष्ट्रातील बदलापूरच्या या घटनेनं त्यात भर घातलीय. या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे.