“छगन भुजबळाच्या नादाला लागून फडणवीसांवर वाईट वेळ आली” – मनोज जरांगे पाटील यांचे धक्कादायक विधान

लातूर, ११ जुलै २०२४: छगन भुजबळ यांच्या नादी लागून फडणवीस तुमच्यावर वाईट वेळ येईल. राज्यातील तुमच्या सर्व सीट्स पाडायला भुजबळ जबाबदार असतील. असं म्हणत मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे यांनी फडणवीसांना इशारा दिला आहे. सध्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांची राज्यभरात शांतता रॅली सुरु आहे. त्यावेळी ते बोलत होते.

पुढे जरांगे म्हणाले की, छगन भुजबळ यांच्या नादी लागून फडणवीस तुमच्यावर वाईट वेळ येईल. पसरलेल्या गैरसमज दूर करण्यासाठी, ओबीसींची मतं मिळवण्यासाठी तुम्ही भुजबळ यांना जवळ केलं आहे. मात्र यामुळे राज्यातील तुमच्या सर्व सीट्स पाडायला भुजबळ जबाबदार असतील. त्यामुळे त्यांचं न ऐकता मराठ्यांना आरक्षण द्या. मी वयाने लहान असेल मात्र तुम्हाला एक सल्ला देतो की, लोकसभेला मी केवळ पाडा म्हटल्याने तुम्हाला मोठा फटका बसला. तर विधानसभेमध्ये छगन भुजबळ यांचा ऐकल्यास तुमच्या सर्व जागा पडतील. असं म्हणत जरांगे यांनी फडणवीसांना इशारा दिला आहे.

नुकतीच सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठक मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यामध्ये आरक्षणासंदर्भात विविध राजकीय पक्ष, संघटनांची भूमिका महत्वपूर्ण असून राज्यात मराठा, ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत चर्चेतून मार्ग निघाला पाहिजे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधीत राखली जातानाच जातीय सलोखा देखील कायम राहीला पाहिजे अशी भुमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली.

मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तो कायद्याच्या चौकटीत टिकण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. हा निर्णय घेतल्यापासून शिक्षण, पद भरतीमध्ये मराठा समाजातील उमेदवारांना लाभ झाला आहे. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देतानाच अन्य समाज घटकांवर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. गॅझेटच्या तपासणीसाठी हैदराबाद येथे ११ जणांची टीम पाठविण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.