पुण्याच्या जवळ नवे पुणे का उभे राहिले नाही ? गडकरी यांचा शहराच्या हद्दवाढीवर सवाल, त्यामुळेच समस्येत वाढ

पुणे, १६ सप्टेंबर २०२३: ‘‘ मुंबईच्या जवळ नवी मुंबई, दिल्लीच्या जवळ न्यू दिल्ली उभी राहिली. मग पुण्याच्या जवळ नवे पुणे का उभे राहिले नाही,’ आशा शब्दात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे शहराच्या हद्दवाढीवर प्रश्‍न उपस्थितीत केला. हे शहर अजून किती वाढू देणार. त्यामुळे आज या शहरात वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाच्या समस्यांमध्ये वाढच होताना दिसत आहे, असेही ते म्हणाले.

क्रेडाई पुणे मेट्रोची ४० वी वार्षिक सर्वसाधारण सभेत ‘राष्ट्र उभारणीमध्ये बांधकाम व्यवसाय आणि पायाभूत सोयीसुविधा यांचे महत्त्व’ या विषयावर गडकरी बोलत होते. त्यावेळी त्यांनी हा प्रश्‍न उपस्थित केला. याप्रसंगी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष बोमन इराणी, क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष रणजित नाईकनवरे, उपाध्यक्ष आदित्य जावडेकर, कपिल गांधी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

एकेकाळी हे शहर उत्तम होते. आज ही प्रत्येक जण पुणे शहरातच राहण्यासाठी उत्सुक आहे, असे सांगून गडकरी म्हणाले, “ पुणे शहराच्या आजूबाजूचा विकासासाठी ५५ हजार कोटी रुपयांची विकास कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. त्यामध्ये शहराच्या चारही बाजूला दुमजली आणि तीनमजली उड्डाणपुलाचे नियोजन आहे. पुणे-बंगलोर, पुणे-औरंगाबाद यासारखे नवीन रस्ते हाती घेण्यात येणार आहेत. या रस्त्यांच्या दोन्ही बाजूस विकसनासाठी मोठी बिगर शेत जमिनी उपलब्ध होणार आहे. तिकडे बांधकाम व्यावसायिकांनी लक्ष द्यावे. स्मार्ट शहराप्रमाणे स्मार्ट व्हिलेज उभारण्यासाठी लक्ष द्यावे. नवे पुणे उभारण्यासाठी प्रयत्न करावा.’’

भारतात बांधकाम व्यवसाय क्षेत्रात बांधकामाचा खर्च खूप असून तो कमी व्हावा, यासाठी विचाराभिमुख प्रयत्न करणे गरजेचे आहे असे सांगून ते म्हणाले, ‘‘बांधकाम व्यावसायिकांनी बांधकामाचा खर्च कमी करण्यासाठी नवसंकल्पनांचा अंतर्भाव करीत नवीन तंत्रज्ञान व बांधकाम सामुग्रीत पर्यायी पदार्थांचा (मटेरिअल्स) वापर करण्यावर भर द्यावा.परंतु आजही पारंपरिक पद्धतीनेच विचार करून बांधकाम केले जाते.अशा बांधकामांमधील घरांची विक्री झपाट्याने होत असल्याने बांधकामांचा खर्च कमी करण्यासाठी फार काही नावीन्यपूर्ण कल्पनांचा विचार करत नाहीत. आयआयटी सारख्या चांगल्या संस्थांच्या सहकार्याने बांधकामाचा खर्च कमी करण्यावर काम करता येऊ शकते.’’

तर रणजित नाईकनवरे म्हणाले, “बांधकाम व्यवसाय क्षेत्र हे एक गुंतागुंतीचे क्षेत्र असून यामध्ये अनेक कायदे, कर आकारणी आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार आहे. मात्र असे असले तरी रेरा कायद्याने या उद्योगाचा कायापालट करून या क्षेत्रात आता पारदर्शकता, जबाबदारीची जाणीव, ग्राहक केंद्रित आणि आर्थिक शिस्त आली आहे. बांधकाम व्यवसाय क्षेत्र २०३० पर्यंत १ ट्रिलियन डॉलर्स पर्यंत वाढण्यास आता सज्ज झाले आहे. या क्षेत्रातून ६ टक्के इतका येणारा जीडीपी हा १४ टक्क्यांपर्यंत पोहोचेल.’’

पुण्यातील पायाभूत सुविधांमधील अलीकडच्या आणि प्रस्तावित घडामोडींची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. बोमन इराणी यांनी बांधकाम व्यावसायिकांना भेडसावणाऱ्या समस्या गडकरी यापुढे मांडत त्याविषयी मदत करण्याची विनंती केली. कपिल गांधी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आदित्य जावडेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप