शेतकऱ्यांच्या योजना बंद करणे आणि भ्रष्टाचार करण्याचा काँग्रेसचा मनसूबा नरेंद्र मोदींची वाशिम येथे टीका

वाशिम, ५ ऑक्टोबर २०२४: केंद्रातील एनडीए सरकार बंजारा समाजासाठी भरपूर काम करत आहे. काँग्रेस आणि महाराष्ट्रातल्या तत्कालीन महाविकास आघाडी सरकारचा समाजाबाबतचा दृष्टीकोन काय होता हे लक्षात ठेवा. पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास योजनेला याच महाविकास आघाडी सरकारने ब्रेक लावला होता. पण राज्यात महायुती सरकार आल्यानंतर या कामासाठी साडेसातशे कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. काँग्रेसला फक्त लूट करायची इतकंच माहिती आहे. म्हणून काँँग्रेसपासून सावध राहा. महाविकास आघाडीचेही दोन अजेंडे आहेत. पहिला शेतकऱ्यांसाठीच्या योजना ठप्प करणे आणि या योजनांतील निधीत भ्रष्टाचार करणे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली.

पंतप्रधान मोदी आज वाशिममध्ये होते. कृषी आणि पशुसंवर्धन विभागातील विविध उपक्रमांचा पीएम मोदी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान, राज्यपाल पी. राधाकृष्णन्, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मंत्री संजय राठोड आदी उपस्थित होते. मोदींनी आपल्या भाषणात केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा उल्लेख केला. तसेच राज्यतील महाविकास आघाडी आणि काँग्रेस पक्षावर जोरदार हल्लाबोल केला.

मोदी पुढे म्हणाले, काँग्रेसपासून सावध रहा. आज काँग्रेसला अर्बन नक्सल लोक चालवत आहेत. या पक्षाला जे लोक भारताला रोखू पाहत आहेत तेच लोक आज काँग्रेसबरोबर दिसतात. दिल्लीत हजारो कोटींचं ड्रग्ज पकडलं. या रॅकेटचा म्होरक्या सुद्धा काँग्रेसचा नेता निघाला. म्हणजेच युवकांना नशेत टाकून त्या पैशांतून निवडणूक लढवायची आणि जिंकायची असा या लोकांचा प्रयत्न आहे. त्यामुळे या लोकांपासून सावध राहा अशी घणाघाती टीका त्यांनी काँग्रेसवर केली.

मविआचं दोन एजंडे शेतकऱ्यांचा योजना ठप्प करणे आणि निधीत भ्रष्टाचार करत होते. आम्ही पैसे देत होतो पण हेच लोक खाऊन टाकत होते. काँग्रेस शेतकरी किसान सन्मान निधी योजनेचा तिरस्कार करत आहे. तेलंगणात अजूनही कर्जमाफी झाली नाही. महाराष्ट्रात सिंचनाची अनेक कामे मविआने रोखून धरली होती अशी जळजळीत टीका पंतप्रधान मोदींनी केली.

बंजारा समाजाचं कला, संस्कृती, व्यापार यांसारख्या अनेक क्षेत्रात मोठं योगदान होतं. या समाजातील व्यक्तींनी जीवन समर्पित केलं. बंजारा समाजाने अनेक संत दिले. या समुदायाने भारताच्या परंपरा जपल्या. पण काँग्रेसने या समाजाला कायमच अपमानजक वागणूक दिली अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.