एखाद्याने हल्ला केल्यावर टाळ्या वाजवत बसणार का? बदलापूर एन्काउंटरवर फडणवीसांचं रोखठोक मत

मुंबई, २७ सप्टेंबर २०२४: बदलापूर लैंगिक अत्याचार घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांकडील पिस्तुल हिसकावून तीन गोळ्या झाडल्या. यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला होता. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला होता. या एन्काऊंटरबाबत विरोधक आणि न्यायालयाकडून अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोखठोक मत मांडल आहे. एखाद्याने हल्ला केला तर पोलीस टाळ्या वाजवत बसणार नाही असं फडणवीस म्हणाले आहेत.

फडणवीस यांना अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात उपस्थित करण्यात आलेल्या आरोपांविषयी विचारण्यात आलं. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी ‘एखाद्या गुन्हेगाराचा एन्काउंटर व्हावा, या मताचे आम्हीदेखील नाही. मला व्यक्तिश: कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात कायद्याचे पालन व्हावे, असं वाटतं. कायद्याच्या माध्यमातूनच गुन्हेगाराला शासन झाले पाहिजे. ही सगळी प्रक्रिया वेगाने पार पडली पाहिजे. अक्षय शिंदे याचा मृत्यू पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात झाला. आमचे पोलीस एखाद्याने हल्ला केल्यावर टाळ्या वाजवत बसणार नाहीत, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

न्यायव्यवस्था कोणाची तरी रखेल झालीये; तरुंगवासाच्या शिक्षेनंतर संजय राऊत कडाडले

अक्षय शिंदे याच्या एन्काउंटरनंतर मुंबई, ठाणे आणि बदलापूर परिसरात अनेक ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचं बॅनर्स लागले होते. या बॅनर्सवर ‘बदला पुरा’, ‘देवाचा न्याय’, ‘देवाभाऊ सुपरफास्ट’ अशा उपाध्या देऊन देवेंद्र फडणवीस यांचा गृहमंत्री म्हणून गौरव करण्यात आला होता. याविषयी देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता त्यांनी म्हटलं की, हा प्रकार अयोग्य आहे. एन्काउंटरसारख्या घटनेचे उदात्तीकरण कधीच होता कामा नये, असे फडणवीसांनी म्हटले. या एन्काउंटरची गुन्हे अन्वेषण विभागाकडून निष्पक्ष चौकशी होईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

कोणी बंदूक घेऊन आलं तर

तुमच्यासमोर कोणी बंदूक घेऊन मारायला आलं तर तुम्ही विचार करत बसाल का? असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात न्यायालयाने पोलिसांच्या कार्यपद्धतीविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. अक्षय शिंदेला बंदूक चालवण्याचे कोणतेही प्रशिक्षण नसताना तो पोलिसांची रिव्हॉल्व्हर हिसकावून, त्याचे लॉक उघडून फायरिंग करु शकतो का? पोलीस नॉर्मली डोक्यात गोळी घालतात का?, अशा प्रश्नांची सरबत्ती न्यायाधीशांनी केली होती. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला न्यायाधीशांवर टीका करायची नाही. पण मला त्यांना विचारायचं आहे की, तुमच्यासमोर कोणी बंदूक घेऊन मारायला आलं तर तुम्ही हा विचार करत बसाल का की असं मारायचं का तसं, असा प्रतिप्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.