काँग्रेसला महाराष्ट्रात संधी देऊ नका, त्यांच्या धोकेबाजीपासून सावध राहा पंतप्रधान मोदी

वर्धा, २० सप्टेंबर २०२४: शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून विविध निर्णय घेतले जात आहेत. शेतकऱ्यांसाठी सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्याचे परिणामही लवकरच दिसतील. शिंदे सरकाने शेतकऱ्यांचे वीजबिल झिरो केले. सिंचनाच्या समस्या सोडविण्यसाठी प्रयत्न सुरू केले. पण मध्येच असे सरकार आले होते त्यांनी या सगळ्या कामांना ब्रेक लावला. पण पुन्हा आमचं सरकार आल्यानंतर कामांना सुरुवात केली. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठीही आम्ही काम करत आहोत. पण आता तुम्हालाही एक खबरदारी घ्यावी लागेल. ज्या काँग्रेसनं शेतकऱ्यांचं वाटोळं केलं धोका दिला त्यांना पुन्हा संधी द्यायची नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर एकापाठोपाठ वार केले.

केंद्र सरकारच्या विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त वर्धा शहरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पीएम मोदींनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली. यावेळी केंद्रीय मंत्री जीतनराम मांझी, जयंत चौधरी, राज्याचे राज्यपाल राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस आदी उपस्थित होते.

मोदी पुढे म्हणाले, महाराष्ट्रातील जनतेने यांच्या धोकेबाजीपासून सावध राहण्याची गरज आहे. कारण आजच्या काळातील काँग्रेस वेगळी आहे. त्यांच्यातील देशभक्तीचा आत्मा आता मरण पावला आहे. त्याच्या जागी आता द्वेषाचं भूत काँग्रेसच्या अंगात संचारलं आहे. काँग्रेस नेत्यांची भाषा पाहा. विदेशात जाऊन देश तोडण्याची, देशाची संस्कृती आणि आस्थेचा अपमान करणारी वक्तव्ये दिली जात आहेत. तुकडे तुकडे गँगच आज काँग्रेसला चालवत आहेत. आज काँग्रेस देशातील सर्वात भ्रष्ट पक्ष बनला आहे. काँग्रेस परिवार देशातील सर्वाधिक भ्रष्ट परिवार बनला आहे, अशी घणाघाती टीका मोदींनी केली.

आजच्या काँग्रेसला तर गणपती पूजेचीही चीड येते. स्वातंत्र्याच्या लढ्यात गणेशोत्सव भारताच्या एकतेचा सर्वात मोठा उत्सव बनला होता. यामुळेच काँग्रेसला गणपती पूजा त्रासदायक वाटते. तुष्टीकरणासाठी काँग्रेस काहीही करू शकते. कर्नाटकात तर काँग्रेस सरकारने गणपतीलाच गजाआड केलं. ज्यावेळी अख्खा महाराष्ट्र गणपतीची आराधना करत होता त्यावेळी कर्नाटकात गणपतीची मूर्ती गजाआड केली जात होती. विशेष म्हणजे काँग्रेसच्या मित्रपक्षांवरही काँग्रेसचा इतका रंग चढला की त्यांनीही या प्रकारावर चकार शब्दही काढला नाही, असे मोदी म्हणाले.

राज्यात याआधीच्या महाविकास आघाडी सरकारने कपाशीला ताकद देण्याऐवजी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं. शेतकऱ्यांच्या नावाने फक्त राजकारण आणि भ्रष्टाचार केला. नंतर २०१४ मध्ये फडणवीसांनंतर खरं काम सुरू झालं. अमरावतीत टेक्सटाईल पार्क आला. हा पार्क येथे येण्याआधी या भागात एकही उद्योग येत नव्हता. पण आज हाच भाग राज्यासाठी मोठं औद्योगिक केंद्र बनत चालला आहे, अशा शब्दांत मोदींनी महायुती सरकारच्या कामाचं कौतुक केलं.