जरांगे अन् माझे चांगले संबंध, त्यांनी मुंबईत यावे चांगला शेवट करू: शिंदेंच्या शिलेदारीची ग्वाही

छत्रपती संभाजीनगर, १६ सप्टेंबर २०२४ ः मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे आजपासून (दि.१६) पुन्हा उपोषणाला बसणार आहे. मात्र, त्याआधी एकनाथ शिंदेंचे खास शिलेदार दीपक केसरकर यांनी जरांगेंना मोठा शब्द दिला आहे. मनोज जरांगे आणि माझे चांगले संबंध आहेत. त्यांना विनंती आहे की, त्यांनी मुंबईत यावे आं चांगला शेवट करू असे म्हणत शेवट १०० टक्के गोड होणार असे म्हटले आहे. तुमचे बहुतांश मुद्दे मान्य झाले असून उपोषण मागे घ्यावे असे आवाहनही केसरकरांनी जरांगेंना केले आहे. केसरकर यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. यांनतर ते पत्रकारांशी बोलत होते.

केसरकर म्हणाले की, गॅझेटचा मुद्दा कॉमन असून, त्यासाठी आंदोलन सुरू आहे. मराठवाडा गॅझेट हे मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करूनच जाहीर करू. शेवट गोड करायला चर्चा करू आणि योग्य निर्णय घेऊ. शिंदेंनी दिलेल्या १० टक्के आरक्षणाला कोर्टाने स्टे दिलेला नाही. हे आरक्षण सुरुच आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील किती तालुके याखाली येतात, याचा इंडेक्स विचारात घेऊ. यासाठी आम्ही विशेष अधिवेशन बोलविले आहे, असे केसरकर म्हणाले. आचारसंहिता लागू होणार आहे. अनुशेष भरून काढला पाहिजे असे केसरकर म्हणाले. दोन समाजात फूट करू नये, दोघांशी बोलून विचार करू. एकी राहायला हवी असेही केसरकरांनी सांगितले.

मुख्यमंत्री महोदय तुमच्या समाजाचे असून, पद गेले तरी चालेल मात्र मुलांना नोकरी लावून देणार असा शब्द शिंदेंनी दिला असून, ज्याठिकाणी गंभीर गुन्हे नाहीत ते मागे घेऊ. मात्र घरे जाळले ते गंभीर गुन्हे असल्याचेते म्हणाले. आरक्षण मिळाले तर याचे श्रेय मुख्यमंत्री आणि आतापर्यंत लढा ज्यांनी दिला त्या बांधवांना आहे. मनोजदादा यांच्या मागण्यात सगेसोयरे आणि हैदराबाद गॅझेटची मागणी असून, त्यांच्याशी चर्चा करूनच याबाबत निर्णय जाहीर करू. जरांगे आणि माझे चांगले संबंध आहेत. त्यामुळे त्यांनी मुंबईत यावे आरक्षणाच्या मुद्द्याचा शेवट चांगला करू असे केसरकर म्हणाले.